नगर पंचायतचे सदस्य अज्ञातस्थळी रवाना
By Admin | Updated: February 4, 2016 01:24 IST2016-02-04T01:24:44+5:302016-02-04T01:24:44+5:30
नगराध्यक्षपदाची निवडणूक; मालेगाव व मानो-यात उलथापालथ.

नगर पंचायतचे सदस्य अज्ञातस्थळी रवाना
वाशिम: मानोरा व मालेगाव नगर पंचायतीच्या निवडणुकीनंतर नगराध्यक्षपदाची निवडणूक जाहीर झाल्याने राजकीय मोर्चेबांधणीने वेग घेतला. दरम्यान, काही सदस्य अज्ञातस्थळी रवाना झाल्याने निवडणुकीत चुरस अधिकच निर्माण झाली आहे. ८ फेब्रुवारीला मालेगाव व मानोरा येथे नगराध्यक्ष पदाचा फैसला होणार आहे. १0 जानेवारीला झालेल्या मालेगाव व मानोरा नगर पंचायत निवडणुकीने बर्याच राजकीय उलथापालथी घडविल्या. मालेगावात काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीने मुसंडी मारत तत्कालिन ग्रामपंचायतच्या सत्ताधार्यांचा दारूण पराभव केला. शिवसंग्रामने पहिल्यांदाच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत उडी घेऊन चार जागा काबिज केल्या. येथे भाजपाला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. विशेष म्हणजे ग्रामपंचायत असताना भाजपाकडे सरपंच पद होते. नगर पंचायतनंतर येथे भाजपाला करारी हार पत्करावी लागली. येथे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने प्रत्येकी चार अशा आठ जागा पटकावून नगर पंचायतमधील सर्वात मोठा पक्ष म्हणून मान मिळविला. शिवसंग्राम चार, शिवसेना तीन व अपक्ष एक असे पक्षीय बलाबल आहे. सत्ता स्थापन्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला एका अपक्ष सदस्याची साथ मिळाल्याचा दावा दोन्ही पक्षाचे नेते करीत आहेत. दुसरीकडे चार जागा जिंकणार्या शिवसंग्रामनेही नगराध्यक्ष पदासाठी फिल्डिंग लावल्याने ऐनवेळी काही चमत्कार होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. काँग्रेसकडे नगराध्यक्षपदाचा उमेदवार नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते ऐनवेळी धोका होऊ नये म्हणून सतर्कतेने पाऊल टाकत असल्याचे दिसून येते. सदस्यांची पळवापळवी होऊ नये म्हणून काही सदस्यांना अज्ञातस्थळी रवाना केल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडे अध्यक्षपद आणि काँग्रेसकडे उपाध्यक्ष पद तर अपक्षाकडे सभापती पद असा करार झाल्याचे वृत्त आहे; मात्र शिवसंग्रामने फिल्डिंग लावल्याने अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील चुरस वाढली आहे. काँग्रेसचे आमदार अमित झनक, राकाँचे बाबाराव पाटील खडसे, दिलीप जाधव, बबन चोपडे, शिवसेनेच्या खासदार भावना गवळी व संतोष जोशी, शिवसंग्रामचे विष्णू भुतेकर, चंदु जाधव, भाजपातर्फे माजी आमदार विजय जाधव यांच्याभोवती अध्यक्षपदाच्या निवडणुकीची चक्रे फिरत आहेत. काँग्रेस-राकाँला सत्तेच्या बाहेर ठेवण्यासाठी ह्यराजकारणह्ण शिजत आहे.; मात्र मालेगावात शिवसंग्राम, शिवसेना व भाजपा एकत्र बसतील काय? हा प्रश्न अनुत्तरीय आहे.