१२ हजार लोकसंख्येच्या किन्हीराजाला समस्यांचा विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:43 IST2021-08-23T04:43:51+5:302021-08-23T04:43:51+5:30
किन्हीराजा हे जिल्हा परिषद सर्कलचे गाव आहे. गावाची लोकसंख्या १२ हजारांपेक्षा अधिक आहे. तसेच १५ ते २० खेड्यांचा दैनंदिन ...

१२ हजार लोकसंख्येच्या किन्हीराजाला समस्यांचा विळखा
किन्हीराजा हे जिल्हा परिषद सर्कलचे गाव आहे. गावाची लोकसंख्या १२ हजारांपेक्षा अधिक आहे. तसेच १५ ते २० खेड्यांचा दैनंदिन किन्हीराजाशी संबंध येतो. ग्रामपंचायत कार्यालय, पोस्ट ऑफिस, आरोग्य उपकेंद्र, जिल्हा परिषद मराठी शाळा, जिल्हा परिषद उर्दू शाळा, पाच अंगणवाडी केंद्र, पोलीस चौकी, आरोग्यवर्धिनी केंद्र, बळीरामआप्पा गोंडाळ आश्रमशाळा, वसंतराव नाईक माध्यमिक उच्च माध्यमिक आश्रमशाळा, बसथांबा आदी ठिकाणच्या रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. एकमेव मुख्य मार्गावरील नाल्यावर पुलाचे दोन महिन्यापूर्वी १४ व्या वित्त आयोगातून रुंदीकरण करण्यात आले; मात्र निकृष्ट दर्जाच्या कामामुळे पुलाला मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यात पावसाचे पाणी साचून चिखल तयार होत असल्याने ये-जा करणाऱ्यांमधून रोष व्यक्त होत आहे.
संबंधित यंत्रणेने याकडे लक्ष पुरवून रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. या पुलावरील रस्त्याची दुरुस्ती करुन पुलावरील खड्डे बुजवावेत अशी मागणी नागरिकासह वाहनधारकाकडून होत आहे.
.............
बाॅक्स :
वाहने घसरताहेत, नागरिकांची तारांबळ
नादुरुस्त रस्त्यावर पावसाचे पाणी साचून चिखल होत आहे. यामुळे रस्ते गुळगुळीत झाले आहेत. त्यावरून वाहने घसरून किरकोळ अपघातांच्या घटना घडत आहेत. या समस्येमुळे नागरिकांची दैनंदिन तारांबळ उडत असून संताप व्यक्त केला जात आहे.