रोहयोच्या कामांतील गैरप्रकाराचे ‘खोदकाम’!
By Admin | Updated: May 13, 2017 05:01 IST2017-05-13T05:01:51+5:302017-05-13T05:01:51+5:30
तपासणीसाठी पथक गठित : पथकाची ‘आॅन दि स्पॉट’ पाहणी.

रोहयोच्या कामांतील गैरप्रकाराचे ‘खोदकाम’!
संतोष वानखडे
वाशिम : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांतील गैरप्रकाराचे ह्यखोदकामह्ण जिल्हा परिषद प्रशासनाने सुरू केले आहे. एका विशेष पथकाने रिसोड तालुक्यातील ४२ कामांना दिलेल्या भेटीत कामांतील अनियमिततेवर शिक्कामोर्तब झाल्याचे विश्वसनीय सूत्र आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सिंचन विहीर, नाला सरळीकरण व नाला खोलीकरण, पांदण रस्ते, रस्ता मजबुतीकरण, वृक्षारोपण, जलसंधारणाची कामे यासह विकासात्मक कामे जॉबकार्डधारक मजूरांकडून केली जातात. जिल्ह्यातील सिंचन विहिरींचा अनुशेष भरून काढण्यासाठी तसेच सिंचन विहिरींची अपूर्ण कामे पूर्णत्वाकडे नेण्यासाठी दीड वर्षांपासून सिंचन विहिरीव्यतिरिक्त अन्य कामे करण्यावर जिल्हा प्रशासनाने बंधन टाकले आहे. अतिशय तातडीचे काम असेल तर वरिष्ठांच्या पूर्वसंमतीशिवाय त्या कामाला सुरुवात करू नये, अशी अट टाकण्यात आली आहे. प्रशासनाच्या या निर्देशांना पायदळी तुडवित काही ठिकाणी सिंचन विहिरीव्यतिरिक्त अन्य कामे सुरू असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेने विशेष पथक गठित केले असून, या पथकामार्फत ह्यआॅन दि स्पॉटह्ण तपासणी सुरू केले आहे. गत तीन दिवसांपासून रिसोड तालुक्यातील जवळपास ४२ कामांची पाहणी या पथकाने केल्याची विश्वसनीय माहिती आहे. आगरवाडी, देगाव, केनवड, मोठेगाव, मांडवा, शेलू, नंधाना, पेनबोरी, करडा, कोयाळी, लेहणी, गोवर्धन, चिंचाबा भर, हराळ, घोटा यासह एकूण ४२ कामांना भेटी देण्यात आल्या. भेटीदरम्यान एकूण ४६ कामे सुरू असल्याचे निदर्शनात आले तसेच वरिष्ठांची पूर्वसंमती न घेता नव्याने १६ कामांना सुरुवात झाल्याचेही समोर आले. काही कामांवर मजूर उपस्थित नसल्याचे आढळून आले तर काही कामे जुनीच असल्याचा गंभीर प्रकारही उघडकीस आल्याची माहिती आहे. लोकसहभागातून केलेल्या एका कामाला रोजगार हमी योजनेंतर्गतच्या कामात दाखविण्याचा प्रतापही करण्यात आल्याचे पाहणीदरम्यान उपस्थित लोकांनी सांगितले, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. काही कामांवर हजेरीपत्रक नसल्याचे आढळून आले. ४२ कामांना भेटी दिल्याचा व आढळलेल्या गंभीर बाबींचा अहवाल या विशेष पथकाने गुरुवार व शुक्रवारी पंचायत विभागाच्या उपमुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांमार्फत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर केला आहे. या अहवालावर आता मुख्य कार्यकारी अधिकारी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दरम्यान, या आॅन दि स्पॉट तपासणीने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
सर्वांचेच धाबे दणाणले
रोजगार हमी योजनेंतर्गतच्या कामांची ह्यआॅन दि स्पॉटह्ण तपासणी सुरू केल्याने कंत्राटदारांसह संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. वरिष्ठांची पूर्वसंमती न घेता काही ठिकाणी नव्याने कामे सुरू असल्याचेही या तपासणीत समोर आल्याने, रोहयोच्या माध्यमातून लाखो रुपयांचे पाणी मुरविले जात असल्याची शक्यता नाकारता येत नाही. पांदण रस्त्यांची कामे बंद असतानाही, सदर कामे सुरू केल्याची बाब तपासणीतून समोर आली.
रोजगार हमी योजनेंतर्गतच्या कामातील गैरप्रकार दूर करण्याच्या दृष्टिकोनातून व प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हाभरात ही मोहीम राबविली जाणार आहे. यामुळे गैरप्रकार करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
बीडीओंचा प्रभार आता शृंगारेंकडे !
रोजगार हमी योजनेंतर्गतच्या वादग्रस्त कामांवरून प्रकाशझोतात आलेल्या रिसोड पंचायत समिती गटविकास अधिकारी पदाचा प्रभार मकासरे यांच्याकडून काढून घेत बालविकास प्रकल्प अधिकारी मदन नायक यांच्याकडे सोपविला होता. मात्र, मध्येच ह्यराजकारणह्ण आडवे आल्याने रुजू होण्यापूर्वीच नायक यांचा प्रभार काढून सहायक गटविकास अधिकारी मोहन शृंगारे यांच्याकडे शुक्रवारी सोपविला.