शेतातून नियमबाह्य रस्ता निर्मिती; पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:48 IST2021-09-23T04:48:07+5:302021-09-23T04:48:07+5:30
मंगरूळपीर : भूमी अभिलेख कार्यालयाच्या अहवालानुसार गटातील शेताच्या नकाशात रस्ता अस्तित्वात नसताना तसेच तत्कालीन तहसीलदारांनी यासंदर्भात निकाल देऊनही विद्यमान ...

शेतातून नियमबाह्य रस्ता निर्मिती; पिकांचे नुकसान
मंगरूळपीर : भूमी अभिलेख कार्यालयाच्या अहवालानुसार गटातील शेताच्या नकाशात रस्ता अस्तित्वात नसताना तसेच तत्कालीन तहसीलदारांनी यासंदर्भात निकाल देऊनही विद्यमान तहसीलदारांच्या आदेशावरून महसूल आणि पोलीस प्रशासनाने सुटीच्या दिवशी शेतातून नियमबाह्य रस्ता निर्मिती केली. त्यासाठी शेतात ट्रॅक्टर फिरल्याने उभ्या पिकांचे नुकसान झाले, अशी तक्रार सार्सी बोथ (ता. मंगरूळळपीर) येथील शेतकरी रामहरी भोयर व किसन भोयर यांनी महसूल आयुक्त, जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडे २१ सप्टेंबर रोजी केली. संबंधितांवर कारवाई करण्याची मागणीही संबंधितांनी केली.
तक्रारीत नमूद केले आहे की, सार्सी येथील गट क्रमांक ११३ मध्ये जाण्याकरिता गैरअर्जदारांनी रस्ता अडविल्याबाबत तक्रार दाखल केली. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यावर सुनावणीसाठी ३० सप्टेंबर २०२१ रोजी ही तारीख देण्यात आली आहे. गट नंबर १०१ मधील शेतातून रस्ता नसल्याबाबत कायदेशीर लढाई सुरू असताना तसेच कायद्यानुसार रस्ता मोकळा करण्याकरिता गैरअर्जदाराने दिवाणी दावा दाखल केला आहे. मध्यंतरीच्या काळात तहसीलदार बागडे यांनी कोविड १९ संसर्ग असल्यामुळे प्रकरण सुनावणीकरिता घेतले नाही; परंतु नव्याने नियुक्त झालेले तहसीलदार नरसय्या कोंडागुर्ले यांनी सखोल अभ्यास न करता २८ ऑगस्ट २०२१ रोजी सुटी असतानाही पोलीस बंदोबस्तात नियमबाह्य कार्यवाही करत ट्रॅक्टरद्वारे पिकांचे नुकसान केले. त्याला विरोध केला असता सरकारी कामात अडथळा आणल्याच्या कारणावरून जेलमध्ये टाकू, अशी धमकी देण्यात आली. या प्रकरणात सात गैरअर्जदार हे शासकीय कर्मचारी असून त्यांनी पारित केलेल्या आदेशाप्रमाणे कारवाई न करता गैरअर्जदाराच्या सांगण्यावरून अन्याय करण्यात आला. संबंधित कर्मचारी व तहसीलदारांवर कारवाई करून न्याय द्यावा, अशी मागणी शेतकरी रामहरी भोयर व किसन भोयर यांनी केली आहे.
.....................
कोट :
सार्सी बोथ येथे करण्यात आलेली कार्यवाही नियमानुसारच आहे. ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे या कार्यवाहीत नुकसान झाले, त्यांना त्याची भरपाई दिली जाईल. ही रक्कम रस्ता अपेक्षित असलेल्या शेतकऱ्यांकडून वसूल करण्याची बाब प्रस्तावित आहे.
- नरसय्या कोंडागुर्ले, तहसीलदार, मंगरूळपीर