सात गावातील शेतक-यांचे उपोषण
By Admin | Updated: May 29, 2015 02:28 IST2015-05-29T02:28:30+5:302015-05-29T02:28:30+5:30
सिंचन विहिरींना प्रशासकीय मान्यता मिळविण्यासाठी मानोरा तालुक्यातील शेतक-यांचे आंदोलन.

सात गावातील शेतक-यांचे उपोषण
मानोरा (जि. वाशिम) : तालुक्यातील आमकिन्ही, धावंडा, शेंदोना, ज्योतिबानगर, बळीरामनगर, सोमनगर, वडगाव या गावातील ५४ अल्पभूधारक शेतकर्यांनी सिंचन विहिरींना प्रशासकीय मान्यता मिळावी याकरिता वेळोवेळी विनंती केली; मात्र संबंधित अधिकारी सतत टाळाटाळ करीत असल्यामुळे या ५४ शेतकर्यांनी २८ मेपासून पंचायत समिती कार्यालयासमोर साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे. अत्यल्प व अल्पभूधारक शेतकर्यांना मनरेगाअंतर्गत सिंचन विहिरीचा लाभ देण्यात यावा, या मागणीसाठी राष्ट्रीय बंजारा क्रांती दलाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष गजानन राठोड यांनी ग्राम विकास मंत्री पंकजाताई मुंडे यांच्याकडे लेखी अर्ज सादर करून पाठपुरावा केला. तेव्हा त्यांनी जिल्हाधिकारी यांना लेखी पत्र देऊन शेतकर्यांच्या सिंचन विहिरीविषयक समस्या सोडविण्याबाबत कळविले. तसेच जिल्हाधिकारी यांनीही मुख्य कार्यकारी अधिकारी व पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्यांना पत्रव्यवहार केला. सिंचन विहिरीची प्रशासकीय मान्यता देण्यात यावी यासाठी गटविकास अधिकारी यांना वेळोवेळी पत्रव्यवहार करून शेतकर्यांसह भेट घेतली; परंतु त्यांनी सदर प्रकरणामध्ये डोळेझाक करून टाळाटाळ करीत उडवाउडवीची उत्तरे देत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. याकरिता वरील गावाच्या शेतकर्यांना न्याय द्यावा या मागणीकरिता उपोषणाला शेतकर्यांनी सुरुवात केली आहे.