शेकडो लाभार्थीच्या नशीबी प्रतिक्षाच
By Admin | Updated: September 12, 2014 22:58 IST2014-09-12T22:58:59+5:302014-09-12T22:58:59+5:30
मालेगाव तहसीलमधील संजय गांधी निराधार योजनेच्यो लाभार्थ्यांचे अर्ज धूळखात.

शेकडो लाभार्थीच्या नशीबी प्रतिक्षाच
वाशिम : जिल्ह्यातील मालेगाव तहसीलमध्ये संजय गांधी निराधार योजनेची दोन महिण्यापासून बैठकच झाली नसल्याने जवळपास चारशे ते पाचशे लाभार्थ्यांचे अर्ज तहसीलमध्ये धूळखात पडले आहेत.
आता विधानसभा निवडणूकिच्या निमीत्ताने आचारसंहिता लागू झाल्याने आचारसंहिता शिथील होईस्तोवर लाभार्थ्यांंना त्यांच्या प्रस्तावास मंजूरी मिळण्याची वाट पाहण्याशिवाय पर्याय नसल्याची माहिती आहे. यासंदर्भात अधिक माहितीनुसार मालेगाव तहसील कार्यालयांतर्गत गठीत संजय गांधी निराधार योजना समितीची बैठक जूलै महिण्यात झाली होती. जूलैच्या मध्यान्हात झालेल्या या समितीच्या बैठकीत शेकडो अर्जांना मंजूरात देण्यात आली असली तरी त्यानंतर दोन महिण्यात संजय गांधी निराधार योजना समितीची एकही बैठक न झाल्याने तेव्हापासून आजतागायत तहसीलमधील संजय गांधी निराधार योजना कक्षाकडे जमा झालेल्या ४00 ते ५00 अर्जावर निर्णय होउ शकला नाही.
प्राप्त माहितीनुसार संजय गांधी निराधार योजनेंतर्गत श्रावण बाळ, इंदिरा गांधी योजना, संजय गांधी निराधार योजना, परित्यक्तया , विधवा , अपंग यांना अनुदान देण्याची सोय आहे. यामध्ये किमान सहाशे रुपये ते एक किंवा दोन अपत्य असलेल्या विधवांना मासिक नउशे रुपये मानधन देण्याची सोय आहे. आता विधानसभा निवडणूकिच्या अनुषंगाने १२ सप्टेंबरपासून निवडणूक आयोगाने राज्यात आदर्श आचारसंहिता लागू केली. त्यामूळे मालेगाव तहसीलमध्ये कार्यरत असलेल्या संजय गांधी निराधार योजना समितीला आता लाभार्थ्यांंचे अर्ज निकाली काढण्यासाठी सभा घेवून निर्णय घेता येणार नाही. अर्थात लाभार्थ्यांना पात्र असूनही योजनेचा लाभ मिळण्यासाठी निवडणूका पार पडण्यासह आदर्श आचारसंहिता शिथील होण्याची वाट पाहण्याशिवाय पर्याय नाही.