कारवाईनंतरही ग्रामपंचायती वीज देयक भरण्याबाबत उदासिनता!
By Admin | Updated: April 19, 2017 19:26 IST2017-04-19T19:26:18+5:302017-04-19T19:26:18+5:30
वाशिम- थकबाकीमुळे जिल्ह्यातील १८६ ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजनांचा विजपुरवठा खंडित करण्यात आला. कारवाईला १५ दिवस उलटल्यानंतरही ग्रामपंचायतींनी अद्याप थकबाकीचा भरणा केलेला नाही.

कारवाईनंतरही ग्रामपंचायती वीज देयक भरण्याबाबत उदासिनता!
वाशिम : जिल्हयातील ४९१ ग्रामपंचायतींपैकी ४४३ ग्रामपंचायतींकडे महावितरणची ६.६१ कोटी रुपये थकबाकी आहे. पाणीपुरवठा योजनांना पुरविल्या जाणाऱ्या विजेची ही थकबाकी वसूल करण्यासाठी धडक मोहीम राबविण्यात येवून १८६ ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजनेला पुरविला जाणारा विजपुरवठा खंडित करण्यात आला. मात्र, या कारवाईला १५ दिवस उलटूनही कुठल्याच ग्रामपंचायतीने अद्याप वीज देयक अदा करण्याबाबत पुढाकार घेतला नाही, अशी माहिती सूत्रांनी बुधवारी दिली.
वाशिम तालुक्यात ६५ ग्रामपंचायतींपैकी केवळ ११ ग्रामपंचायतींनी त्यांच्याकडे असलेली थकबाकी अदा केली आहे. या तालुक्यात ४४ ग्रामपंचायतींमधील पाणीपुरवठा योजनेला पुरविला जाणारा विजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात आली. मालेगाव तालुक्यात ७९ ग्रामपंचायतींपैकी ३९ ग्रामपंचायतींचा विजपुरवठा तोडण्यात आला. रिसोड तालुक्यातील ५१ पैकी २५, मंगरूळपीर तालुक्यात ७३ पैकी ३४, मानोरा तालुक्यात ७५ पैकी १२; तर कारंजा तालुक्यात १०० ग्रामपंचायतींपैकी ३२ ग्रामपंचायत क्षेत्रातील पाणीपुरवठा योजनेला पुरविला जाणारा विजपुरवठा खंडित करण्याची धडक कारवाई करण्यात आली आहे.