संवादाची दरी बिघडवू शकते मानसिक स्वास्थ्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:50 IST2021-09-07T04:50:03+5:302021-09-07T04:50:03+5:30
कोरोनामुळे अनेक कारणांनी ताणतणाव, कलह वाढले आहेत. रोजगार गेल्याने कौटुंबिक कलह तर काही ठिकाणी नोकरी असुरक्षित असल्याची भावनाही ताणतणावास ...

संवादाची दरी बिघडवू शकते मानसिक स्वास्थ्य
कोरोनामुळे अनेक कारणांनी ताणतणाव, कलह वाढले आहेत. रोजगार गेल्याने कौटुंबिक कलह तर काही ठिकाणी नोकरी असुरक्षित असल्याची भावनाही ताणतणावास कारणीभूत ठरते. इतरही काही कारणांनी आलेले नैराश्य, नकारात्मक भावना आणि त्यासोबतच अव्यक्त होण्याचे प्रकार वाढत आहेत. परिणामी, घराघरांत संवाद अत्यल्प होत असून, अनेक जण मानसिक तणावाखाली वावरत असल्याचे समोर येत आहे. कामाचा ताण, घराचे हप्ते, हाती पैसे नसणे यामुळे कुटुंबाचे कसे होणार? जबाबदाऱ्या कशा पूर्ण होणार? याचा मनावर ताण असतो. योग्यवेळी योग्य व्यक्तीकडे याबाबत व्यक्त न झाल्यास समस्या वाढतात. या समस्या टाळण्यासाठी व्यक्त व्हा, मोकळे व्हा, बोलते व्हा. जवळच्या व्यक्तीसोबत संवाद वाढवा, असा सल्ला मानसोपचार तज्ज्ञांनी दिला.
०००००
मन हलके करणे हाच उपाय
नकारात्मक काढून सकारात्मक विचार करणे.
नियमित व्यायाम, योग व प्राणायाम करणे.
कुटुंबातील सदस्यांसोबत एकत्र जेवण करणे, एकत्र वेळ घालविणे.
रागावर नियंत्रण मिळविणे.
जवळच्या व्यक्तीजवळ व्यक्त होणे.
सकस आहार घेणे.
पुरेशी झोप घेणे.
चिडचिड न करणे.
...................
कोरोनामुळे अनेकांमध्ये मानसिक ताणतणाव दिसून येतो. मानसिक स्वास्थ्य टिकविण्यासाठी संवाद वाढविणे आवश्यक आहे. निकटर्तीय, मित्र, कुटुंबीय यांच्याजवळ आपले विचार, भावना व्यक्त केल्याने तणाव कमी होण्यास मदत होते.
- डॉ. रवींद्र अवचार
मानसोपचार तज्ज्ञ, वाशिम
................
मानसिक स्वास्थ्य टिकविण्यासाठी सदैव चिंतामुक्त राहणे आवश्यक आहे. एखाद्या विषयाचा ताण असेल तर त्याबाबत जवळच्या व्यक्तीशी, कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधला पाहिजे. संवादातून मार्ग निघतो.
- डॉ. मंगेश राठोड,
मानसोपचार तज्ज्ञ, वाशिम.