ऑनलाइन शिक्षणामुळे बाराखडीचा पडतोय विसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:50 IST2021-09-07T04:50:10+5:302021-09-07T04:50:10+5:30
वाशिम : कोरोनामुळे आताही शाळा बंद असून, ऑनलाईन पद्धतीने शिक्षणाचे धडे दिले जात आहेत. लहान मुलांना प्रत्यक्ष शिक्षण नसल्याने ...

ऑनलाइन शिक्षणामुळे बाराखडीचा पडतोय विसर
वाशिम : कोरोनामुळे आताही शाळा बंद असून, ऑनलाईन पद्धतीने शिक्षणाचे धडे दिले जात आहेत. लहान मुलांना प्रत्यक्ष शिक्षण नसल्याने बाराखडी आणि उजळणीचा विसर पडत असल्याचे दिसून येते.
कोरोनामुळे गतवर्षी मार्चपासून शाळा बंद आहेत. विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून शासनाने ऑनलाइन शिक्षणाची सुविधा केली आहे. यंदाही प्रत्यक्ष शिक्षणासाठी आतापर्यंत प्राथमिक शाळा सुरू झालेल्या नाहीत. ग्रामीण भागातील कोरोनामुक्त असलेल्या गावात आठवी ते १२ वीपर्यंतचे वर्ग सुरू आहेत. प्राथमिक शाळा सुरू झालेल्या नसल्याने या वर्गातील मुलांना ऑनलाइन शिक्षण देण्यात येत आहे. ऑनलाइन शिक्षणाच्या नावाखाली मुलांच्या हातात मोबाईल पडतात. त्यामुळे अनेक मुले मोबाईलच्या आहारी जात असल्याच्या पालकांच्या तक्रारी आहेत. शाळेत प्रत्यक्ष दिले जात असलेले शिक्षण प्रभावी असल्याने दुसरी पासूनच मुलांना बाराखडी, उजळणी मुखपाठ असते. परंतु गत दीड वर्षापासून शाळेपासून दुरावलेल्या मुलांना जोड शब्दांचे वाचन करणे कठीण जात आहे. शाळा बंद असल्याने दीड वर्षापासून या विद्यार्थ्यांनी शाळा पाहिली नाही किंवा गुरुजींची भेट झाली नाही. तसेच बाराखडी अक्षरे गिरविले नाहीत. शिक्षणाचा मूळ पाया कच्चा राहत असल्याने पालकांची चिंता वाढत आहे.
.....................
पहिलीतील विद्यार्थी १९,६९०
दुसरीतील विद्यार्थी २०,१९८
तिसरीतील विद्यार्थी १९,६९८
००००००००००००००
पालक म्हणतात... जोड शब्दांचे वाचन कठीणच
कोट
प्रत्यक्ष शाळेत जोडशब्द, जोडाक्षरे, बाराखडी, उजळणी आदी शिकविले जाते. ऑनलाईन पद्धतीने जोडशब्द, जोडाक्षरे, बाराखडी शिकविणे थोडे जिकिरीचे ठरत आहे. त्यामुळे लहान मुलांचा शैक्षणिक पाया कच्चा राहण्याची भीती आहे.
- राजेश भारती
पालक.
......................
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्राथमिक शाळा अद्याप सुरू झाल्या नाहीत, ही बाब आरोग्याच्या दृष्टिकोनातून स्वागतार्ह म्हणावी लागेल. दुसरीकडे ऑनलाईन पद्धतीतून पायाभूत शिक्षणाचे धडे मिळत नसल्याचेही समोर येत आहे.
- डॉ. विठ्ठल गोटे, पालक