अळ्यांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शेतकऱ्यांचा आटापिटा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 02:00 IST2017-07-25T02:00:14+5:302017-07-25T02:00:14+5:30
फवारणीस वेग : पानांची चाळणी

अळ्यांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शेतकऱ्यांचा आटापिटा!
लोकमत न्यूज नेटवर्क
दगडउमरा : परिसरात सोयाबीन पिकावर पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने व पानांची चाळणी होत असल्याने त्याला आटोक्यात आणण्यासाठी शेतकऱ्यांना चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे. सद्यस्थितीत परिसरात फवारणीला वेग आला आहे.
दगडउमरा परिसरातील शेतांमध्ये सध्या शेतकरी कीटकनाशकांची फवारणी करण्यावर जोर देत असून, फवारणी करताना अळ्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसत असून, पानांची चाळणी झाली असून अळ्यांनी संपूर्ण पीक कुरतडून टाकले आहे. सोयाबीन पिकावर पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे पीक अडचणीत आले आहे. यामुळे उत्पादनात घट होण्याची मोठी शक्यता असल्याने परिसरातील शेतकरी अळ्यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. केवळ सोयाबीनच नव्हे, तर मूग, उडीद, तूर आणि कपाशीच्या पिकांवरही या पाने खाणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी चिंतेत दिसून येत आहेत.