नापिकीची धास्ती; तीन शेतकर्यांनी कवटाळले मृत्यूला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 01:23 IST2017-08-18T01:23:22+5:302017-08-18T01:23:50+5:30
वाशिम: गत २५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने हलक्या दर्जाच्या जमिनीवरील पिके सुकत आहेत. दरम्यान, सोयाबीन पीक करपून गेल्याने एका शेतकर्याने तर कर्ज व नापिकीला कंटाळून दोन शेतकर्यांनी मृत्यूला कवटाळल्याचा प्रकार गुरुवारी समोर आला.

नापिकीची धास्ती; तीन शेतकर्यांनी कवटाळले मृत्यूला!
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: गत २५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने हलक्या दर्जाच्या जमिनीवरील पिके सुकत आहेत. दरम्यान, सोयाबीन पीक करपून गेल्याने एका शेतकर्याने तर कर्ज व नापिकीला कंटाळून दोन शेतकर्यांनी मृत्यूला कवटाळल्याचा प्रकार गुरुवारी समोर आला.
जिल्ह्यात एकूण ५ लाख १३ हजार हेक्टर क्षेत्र पेरणीलायक असून, त्यापैकी यावर्षी ४ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर खरिपातील विविध पिकांची पेरणी झाली. गत महिनाभरापासून पावसाचा थेंबही नसल्याने पिके सुकत चालल्याचे दिसून येते. हलक्या दर्जाच्या जमिनीवरील पीकपरिस्थिती भयावह आहे. सोयाबीनच्या एकरी उत्पादनात प्रचंड घट येण्याची शक्यता किनखेडा येथील पंजाबराव अवचार या शेतकर्यांनी व्यक्त केली. ऐन शेंगा धरण्याच्या कालावधीत पाऊस गायब असल्याने शेतकर्यांची चिंता अधिकच वाढली आहे. पावसाअभावी सुकत चाललेली पिके पाहून हताश झालेल्या तीन शेतकर्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना जिल्ह्यात १७ ऑगस्ट रोजी उघडकीस आल्या.
वाशिम तालुक्यात १७ ऑगस्ट रोजी दोन शेतकर्यांनी याच कारणामुळे मृत्युला कवटाळले. यामध्ये तोंडगाव येथील दत्ता शालिकराम गोटे या शेतकर्याने शेतातील सोयाबीन पीक वाळल्यामुळे शेतशिवारात विषारी द्रव्य प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविली. या घटनेची फिर्याद मृत दत्ता गोटे यांचे बंधु राम गोटे यांनी वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशनला दिली. फिर्यादीत मृत शेतकर्याकडे १७ गुंठे शेत असल्याचे नमूद आहे. त्याशिवाय केकतउमरा येथील युवा शेतकरी अशोक किसन घोडे याने बँकेच्या कर्जापायी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी ८ वाजता उघडकीस आली. सदर घटनेची फिर्याद गजानन किसनाजी घोडे यांनी वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशनला दिली. मृत अशोक घोडे याने वडिलांच्या व काकांच्या नावाने संयुक्त शेतीवर ४0 हजाराचे कर्ज काढले होते. गत २५ दिवसांपासून पाऊस नसल्याने पीक सुकत चालल्याचे पाहून घोडे यांची चिंता वाढली होती. कर्जाची परतफेड कशी करावी, या चिंतेतून त्यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
मंगरुळपीर तालुक्यातील दाभा येथील रामभाऊ सवाईराम जाधव नामक शेतकर्याने नापिकी व कर्जाला कंटाळून विषारी द्रव्य प्राशन करीत आत्महत्या केल्याची घटना १७ ऑगस्टला उघडकीस आली. रामभाऊ जाधव यांच्याकडे साडेचार एकर कोरडवाहू शेती आहे. त्यांनी शेतीसाठी कर्ज काढले होते.
नापिकीमुळे कर्जाची परतफेड करणे शक्य झाले नाही. आताही पावसाने दडी मारल्याने ते चिंताग्रस्त होते. या चिंतेतून त्यांनी दाभा परिसरातील शेतशिवारात विषारी द्रव्य प्राशन करुन आपली जीवनयात्रा संपविली. जाधव यांच्याकडे ३0 हजाराच्या वर बँकेचे कर्ज होते. यासंदर्भात आकाश जाधव यांनी फिर्याद दिल्याने मंगरूळपीर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.