आपत्कालीन पीक नियोजन

By Admin | Updated: July 6, 2014 23:30 IST2014-07-06T19:33:34+5:302014-07-06T23:30:29+5:30

यावर्षी पावसाचा विचार करून पिकाचे नियोजन करावे असा सल्ला शेतकर्‍यांना कृषी अधिकारी यांनी दिला.

Emergency Peak Planning | आपत्कालीन पीक नियोजन

आपत्कालीन पीक नियोजन

कारंजालाड : यावर्षी पावसाचा विचार करून पिकाचे नियोजन करावे असा सल्ला शेतकर्‍यांना कृषी अधिकारी एस.आर.धुळधुळे यांनी दिला.
कारंजा तालुक्यामध्ये दरवर्षीचा विचार केल्यास जून महिन्याच्या दुसर्‍या किंवा तिसर्‍या हप्त्यात खरीप हंगमाच्या पेरण्या पूर्ण होत असतात. परंतु यावर्षीच्या खरीप हंगामात जुलै महिना उजाडूनही पुरेसा पाऊस नसल्यामुळे तालुक्यातील शेतकरी बांधवाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. त्यामुळे पेरणीचे फेरनियोजन करण्याची वेळ शेतकरी बांधवावर आलेली आहे. मुंग, उडिद पिकाची सलग पेरणी ३0 जून पर्यंतच करावयाची असल्यामुळे शेतकरी बांधवांनी मुंग, उडिद पिकाची सलग पेरणी करू नये. जुलैच्या पहिल्या आठवड्यात पाऊस आला तर मुंग, उडिद पिकाची आंतरपिक म्हणून पेरणी करावी व यावेळी २0 टक्के बियाणे जादा वापरावे. त्याचप्रमाणे कापूस पिकाची लागवड करताना खोल, मध्यमखोल, काळी जमिनीचाच वापर करावा. तसेच कापूस पिकामध्ये मुंग, उडिद, सोयाबीन या पिकाची आंतरपिक म्हणून पेरणी करावी. तसेच संपूर्ण क्षेत्रावर एकच पिक आंतरपिक म्हणून न घेता खालीलप्रमाणे नियोजन करावे. कापूस :ज्वारी :तूर: ज्वारी (६:१:१:१) १ जुलै ते ७ जुलैपर्यंत पाऊस लांबल्यास संकरीत किंवा देशी कापसाचे लवकर पक्व होणारे वाण वापरावे २0 टक्के बियाणे अधिक वापरून दोन झाडातील अंतर कमी ठेवावे. ७ जुलै ते १५ जुलै पर्यंत पाऊस लांबल्यास सोयाबीनची पेरणी करताना २,६ किंवा ९ ओळीनंतर तूर पिकाची आंतरपिक म्हणून पेरणी करावी. मुंग, उडीद ही पिके उथळ काळ्या जमिनीत लावावी असे आवाहन तालुका कृषी अधिकारी एस.आर.धुळधुळे यांनी केले आहे.

Web Title: Emergency Peak Planning