गुणवत्तेच्या आधारावर मिळणार अकरावीला प्रवेश!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:43 IST2021-08-23T04:43:14+5:302021-08-23T04:43:14+5:30
वाशिम : अकरावी प्रवेशासाठी घेण्यात येणारी सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) न्यायालयाने रद्द केल्याने, आता गुणवत्तेच्या आधारावर अकरावीला प्रवेश मिळणार ...

गुणवत्तेच्या आधारावर मिळणार अकरावीला प्रवेश!
वाशिम : अकरावी प्रवेशासाठी घेण्यात येणारी सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) न्यायालयाने रद्द केल्याने, आता गुणवत्तेच्या आधारावर अकरावीला प्रवेश मिळणार आहे. २१ऑगस्टपासून प्रवेश अर्ज वितरण व स्वीकृतीला सुरुवात झाली असून, २७ ऑगस्टपर्यंत ही प्रक्रिया चालणार आहे.
यंदा कोरोनामुळे दहावीची परीक्षा रद्द झाली असून, मूल्यमापनाच्या आधारे जिल्ह्यातील १९,१९१ पैकी १९,१८८ विद्यार्थ्यांना उत्तीर्ण घोषित करण्यात आले. दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या तुलनेत अकरावीतील प्रवेशित जागा अधिक असल्याने प्रवेशापासून शक्यतोवर कुणी वंचित राहणार नाही. मात्र, गुणवत्तेनुसार मनासारख्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळणार आहे. अकरावीची सीईटी परीक्षा उच्च न्यायालयाने रद्द केली आहे. अकरावीच्या प्रवेशाबाबत शालेय शिक्षण विभागाकडून मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या असून, त्यानुसार २१ ऑगस्टपासून प्रवेश अर्ज वितरण व स्वीकृतीला प्रारंभ झाला आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शक्यतोवर ऑनलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवावी लागणार आहे. जेथे ऑनलाइन पद्धतीने प्रवेश करणे शक्य नाही, तेथे अंतराचा निकष आणि कोरोनाविषयक नियमाचे पालन करून विद्यार्थ्यांना टप्प्याटप्प्याने बोलवावे, अशा सूचना देण्यात आल्या. अनुदानित तुकड्यावरील विद्यार्थी प्रवेश क्षमता पूर्ण झाल्यानंतर क्रमाने विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित तुकड्यांमध्ये प्रवेश क्षमता पूर्ण करावी. नियमानुसार प्रवेश प्रक्रिया राबवावी, अशा सूचना माध्यमिक शिक्षणाधिकारी रमेश तांगडे यांनी दिल्या.
००
आरक्षणाची अंमलबजावणी करावी लागणार
प्रवेशाची कार्यवाही करताना विविध मागास प्रवर्गाकरिता नियमानुसार आरक्षित जागा ठेवाव्या लागणार आहेत. राज्य व केंद्र शासनाचे कर्मचारी, संरक्षण विभागातील कर्मचारी, बदलीने आलेले खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे पाल्य तसेच दिव्यांग व्यक्ती, आजी, माजी सैनिकांचे पाल्य, खेळाडू आदींनादेखील निर्धारित आरक्षण धोरणानुसार प्रवेश द्यावे लागणार आहेत.
०००००००००००००
कोट
अकरावी प्रवेशाबाबत शिक्षण विभागाकडून मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यात २१ ते २७ ऑगस्ट या दरम्यान प्रवेश अर्ज वितरण व स्वीकृती आणि त्यानंतर गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे, प्रवेश देणे आदी प्रक्रिया पार पडणार आहेत. प्रवेश देताना कोरोनाविषयक नियमांचे पालन करावे, कुठेही गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचना मुख्याध्यापक, प्राचार्यांना देण्यात आल्या.
- रमेश तांगडे
शिक्षणाधिकारी (माध्यमिक), वाशिम
००००
असे आहे प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक
प्रवेश अर्ज वितरण व स्वीकृती २१ ते २८ ऑगस्ट
अर्जाची छानणी करणे २८ ऑगस्ट
एकत्रित गुणवत्ता यादी ३० ऑगस्ट
प्रवेश देणे ३० ऑगस्ट ते ४ सप्टेंबर
पहिली प्रतीक्षा यादी ६ सप्टेंबर
प्रतीक्षा यादीतील प्रवेश देणे ६ ते ७ सप्टेंबर
दुसरी प्रतीक्षा यादी ८ व ९ सप्टेंबर
दुसऱ्या यादीतील प्रवेश देणे ११ ते १३ सप्टेंबर
शाळांनी अहवाल सादर करणे १४ सप्टेंबरपर्यंत