दुष्काळाच्या सावटाखाली पोळा

By Admin | Updated: August 23, 2014 23:16 IST2014-08-23T22:36:50+5:302014-08-23T23:16:37+5:30

सजावट साहित्य खरेदीत निरूत्साह : दिवसागणिक बैलांच्या संख्येत घट

Dump under a drought | दुष्काळाच्या सावटाखाली पोळा

दुष्काळाच्या सावटाखाली पोळा

वाशिम : शेतकर्‍यांचे दैवत मानल्या जाणार्‍या वृषभराजा पोळा सण सोमवारी सर्वत्र साजरा होत असला तरी या सणावर यंदा कोरड्या दुष्काळाचे सवाट पसरले आहे. त्यामुळे बळीराजा हवालदिल झाला असुन आपल्या लाडक्या सर्जा-राजाची सरबराई करताना राहणार्‍या उणीवा पाहून त्यांचा कंठ दाटुन येत आहे. बैलाचे शेतकर्‍यांच्या जीवनात अनन्य साधारण महत्व आहे. बैल ऊन, वारा, पाऊस व थंडीतही राबराब राबून शेतकर्‍यांचे जीवन सावरत असतात. त्यामुळे शेतकरी या दैवताच्या ऋणातून उतराई होण्याकरीता शेतकरी पोळ्याच्या दिवशी या बैलांना विविध आभुषणे घालुन त्यांना पुरण पोळीचा नैवेद्य अर्पण करतात. यंदा मात्र कोरड्या दुष्काळामुळे शेतकर्‍यांना हा सण साजरा करताना अडचणी निर्माण होत आहेत. यावर्षी पोळ्यावर कोरड्या दुष्काळाचे सावट असल्याने शेतकरी निरूत्साही दिसून येतो. सजावट साहित्य खरेदीत निरूत्साह : दिवसागणिक बैलांच्या संख्येत घटसजावट साहित्य खरेदीत निरूत्साह : दिवसागणिक बैलांच्या संख्येत घट

** कोरड्या दुष्काळामुळे शेतकरी चिंतेत

ऑगस्ट महिन्याचा पंधरवाडा लोटला तरी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस नाही. पाऊस नसल्याने चार्‍याची टंचाईही तिव्र बनली आहे. तिबार पेरणी करूनही शेतमाल घरात येईल, याची शाश्‍वती राहिली नाही. परिणामी, या पोळ्यावर कोरड्या दुष्काळाबरोबरच चिंतेचे ढगही गडद आहेत. गतवर्षी अतवृष्टीने शेतकर्‍यांच्या डोळ्यात पाणी आणले आणि फेब्रुवारी-मार्च २0१४ मधील गारपीटीने शेतकर्‍यांना गारद केले. त्यानंतर मृग नक्षत्रात आणि आताही पाऊस हुलकावणी देत आहे. त्यामुळे पिक परिस्थिती म्हणावी तशी समाधानकारक नाही. या सर्वांंचा परिणाम पोळा सणावरही होत आहे. बैल सजावटीचे साहित्य खरेदी करताना शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावर उत्साह दिसून येत नाही.

** यांत्रिककरणाने घटविले बैल

गत दहा वर्षांंपूर्वी कृषी क्षेत्रातील सर्वच कामे बैलांच्या सहाय्याने केली जात असत. यामध्ये वखरणी पासून तर पेरणी पर्यतच्या कामांचा समावेश होता. परंतु हळुहळु कृषी क्षेत्रात यांत्रिकीकरणाने आपली मुळे घट्ट रोवणे सुरू केली आहे. त्यामुळे कधीकाळी बैलांच्या सहाय्याने होणारी शेतीच्या मशागतीची कामे आता यंत्राच्या सहाय्याने होत आहेत. शेतातील बहुतांश कामे सद्या डिझेलवर चालणार्‍या ट्रॅक्टरने केली जातात. यामध्ये नांगरणी, डवरणी, वखरणी एवढेच नव्हेतर पेरणीचाही समावेश आहे. यांत्रिकीकरणामुळे शेतीची कामांची गती वाढली. बैलाच्या सहाय्याने करण्यात येणार्‍या नागरणीसाठी लागणार्‍या वेळेच्या तुलनेत ट्रॅक्टरने होणारी नांगरणी केवळ अध्र्यांंपेक्षाही कमी वेळात आटोपल्या जाते. त्यामुळे शेतकर्‍यांनी यांत्रिकीकरणाला पसंती दिली असुन याचा परिणाम बैलांच्या संख्येवर होत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.

** चारा टंचाईही कारणीभूत

गत काही वर्षापासून दुष्काळ शेतकर्‍यांच्या पाचविलाच पुजला आहे. कधी ओला तर कधी कोरड्या दुष्काळाने शेतकर्‍यांच्या नाकीनऊ आणल्याचे अनेक उदाहरणे आहेत. दुष्काळामुळे पाणीटंचाई व चाराटंचाई नेहमीच शेतकर्‍यांना त्रस्त करीत आहेत. चाराटंचाईमुळे हवालदिल होत असलेल्या शेतकर्‍यांनी आता पशुधन कमी करण्याचा सपाटा चालविला आहे. बैलांच्या बोलक्या आकडेवारीवरून ही बाब अधोरेखित होत आहे. पूर्वी ग्रामिण भागातील शेतकर्‍यांच्या घरोघरी बैलांची जोडी असायची आता मात्र, बोटावर मोजण्या इतक्या शेतकर्‍यांकडेच बैलजोडी आहे. बैलांची संख्या कमी होण्याला चाराटंचाईचेही मुख्य कारण आहे. शिवाय ग्रामिण भागात मजुरांचा निर्माण होणारा तुटवडाही बैलांची संख्या कमी होण्यास कारणीभुत असल्याचे अनेक शेतकरी सांगतात.

Web Title: Dump under a drought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.