दुष्काळाच्या दाहकतेवर कायमस्वरूपी उपाययोजना हव्यात!
By Admin | Updated: January 26, 2016 02:21 IST2016-01-26T02:21:59+5:302016-01-26T02:21:59+5:30
सरपंच परिषदेत वाशिम जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्याचा ठराव पारित.

दुष्काळाच्या दाहकतेवर कायमस्वरूपी उपाययोजना हव्यात!
वाशिम: गत तीन-चार वर्षांंपासून जिल्हय़ात नैसर्गिक आपत्ती कोसळत आहे. परिणामी दुष्काळाच्या दाहकतेत सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरी होरपळून जात आहे. यातून शेतकर्यांना सावरण्यासाठी, दुष्काळाच्या दाहकतेवर कायमस्वरूपी उपाययोजना आवश्यक असल्याचा सूर सरपंच परिषदेतून निघाला. दुष्काळी परिस्थितीवर चर्चा, जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्याची आग्रही मागणी व शेतकर्यांना मार्गदर्शन या तीन उद्देशातून २५ जानेवारीला स्थानिक जुन्या जिल्हा परिषदेच्या जिजाऊ सभागृहात सरपंच परिषद पार पडली. या परिषदेचे उद्घाटन माजी खासदार अनंतराव देशमुख यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प. अध्यक्ष सोनाली विनोद जोगदंड, प्रमुख मार्गदर्शक म्हणून भाई रजनीकांत व स्वागताध्यक्ष म्हणून कृषी व पशुसंवर्धन सभापती सुभाष शिंदे उपस्थित होते. यावेळी जि. प. उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, सभापती ज्योती गणेशपुरे, माजी जि.प. अध्यक्ष दिलीप जाधव, पं.स. सभापती विरेंद्र देशमुख, भास्कर पाटील, वर्षा नेमाने, धनङ्म्री राठोड, छाया पाटील, कुसुम लबडे आदींची उपस्थिती होती. यावेळी माजी खासदार अनंतराव देशमुख म्हणाले की, दुष्काळाच्या तीव्रतेची जाणीव सरकारला करून देण्यासाठी वाशिम येथे सरपंच परिषद होणे, ही स्तुत्य बाब आहे. पैसेवारी ५0 पेक्षा कमी असल्याने दुष्काळ घोषित करणे ही बेसिक बाब आहे. दुष्काळाच्या दाहकतेत शेतकरी होरपळून निघत असतानाही शासन काहीच उपाययोजना करीत नसेल तर शेतकर्यांच्या समस्येत भर पडल्याशिवाय राहणार नाही. दुष्काळाची दाहकता कमी करणे हे शासनाच्या हाती असून, कायमस्वरूपी उपाययोजनांसाठी सर्वांगीण प्रयत्नांची गरज आहे. दुष्काळावर उपाययोजना करताना विभागवार नियोजन करणे गरजेचे आहे. ठोस व कायमस्वरूपी उपाययोजनाच शेतकर्यांना दुष्काळी परिस्थितीत तारू शकतात, असे अनंतराव देशमुख यांनी स्पष्ट केले. भाई रजनीकांत यांनी पैसेवारी कशी काढतात, पैसेवारीची पद्धती, दुष्काळी परिस्थितीत शेतकर्यांनी काय करावे, आदीबाबत सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक तथा वाशिम बाजार समितीचे संचालक राजू चौधरी व माजी पंचायत समिती सदस्य विनोद जोगदंड यांनी केले. राजू चौधरी व विनोद जोगदंड यांनी दुष्काळी परिस्थितीत शेतकर्यांना दिलासा मिळावा म्हणून सरपंच परिषदेचे आयोजन केल्याचे यावेळी सांगितले. परिषदेच्या यशस्वितेसाठी आयोजक तथा जि. प. सदस्य गजानन अमदाबादकर, सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू पायघन यांच्यासह मान्यवरांनी परिश्रम घेतले. यावेळी जिल्हाभरातील सरपंचांची बहुसंख्येने उपस्थिती होती.