विक्रीअभावी आंबे जागीच सडताहेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:41 IST2021-05-13T04:41:58+5:302021-05-13T04:41:58+5:30
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना विषाणू संसर्गाचे संकट अधिकच गंभीर झाले आहे. सध्या कोरोना बाधितांचा एकूण आकडा ३३ हजार ...

विक्रीअभावी आंबे जागीच सडताहेत
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना विषाणू संसर्गाचे संकट अधिकच गंभीर झाले आहे. सध्या कोरोना बाधितांचा एकूण आकडा ३३ हजार ४४१ वर पोहोचला असून, ३४८ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे; तर ४३१७ जणांवर शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान, कोरोना संसर्गाची ही साखळी खंडीत करण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने ९ मेपासून जिल्हाभरात कडक निर्बंध लागू केले आहेत. याअंतर्गत रुग्रालये व मेडिकल्स वगळता अन्य सर्व दुकाने, आस्थापना, फळविक्री सक्तीने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, या निर्बंधामुळे फळविक्री करणाऱ्यांवर संक्रांत ओढवली असून, ९ मेपूर्वी ज्या व्यावसायिकांनी चिकू, अंगूर, पपई यासह आंब्याचा स्टाॅक करून ठेवला, त्यांच्याकडील फळे जागीच सडत आहेत. यामुळे फळविक्रेत्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. प्रशासनाने घरपोच फळे पोहोचविण्यास परवानगी दिली; मात्र कोरोनाच्या भीतीमुळे नागरिकांकडून मागणीच नसल्याने हा पर्याय फायदेशीर ठरत नसल्याचे दिसून येत आहे.
.............................
बाॅक्स :
महागडा हापूस आंबा पडतोय काळा
जिल्ह्यातील अनेक फळविक्रेत्यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही ग्राहकांकडून मागणी होत असल्याने कोकणातील हापूस आंब्याच्या पेट्या उपलब्ध केल्या होत्या; मात्र ९ मे पासून विक्रीच बंद असल्याने पेट्यांमधील आंबाही काळा पडत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
.................
कोट :
फळांची विक्री वेळेत झाली, तरच त्यातून पैसे मिळतात; अन्यथा फळे जागीच सडून मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागते. ९ मे पासून विक्री पूर्णत: बंद असल्याने इतर फळांसोबतच विशेषत: आंबे जागीच खराब झाली आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यात महागडा हापूस आंबा डोळ्यादेखत सडताना पाहणे अशक्य झाले आहे.
- शे. अजीज शे. गफ्फूर
फळविक्रेता, वाशिम