संततधार पावसाने काजळेश्वरातील रस्त्यांना नाल्याचे रूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:47 IST2021-09-12T04:47:33+5:302021-09-12T04:47:33+5:30
कारंजा तालुक्यात गत सहा दिवसांपासून धोधो पाऊस कोसळत आहे. त्यात सोमवार व मंगळवारी काजळेश्वर येथे मुसळधार पाऊस आला. या ...

संततधार पावसाने काजळेश्वरातील रस्त्यांना नाल्याचे रूप
कारंजा तालुक्यात गत सहा दिवसांपासून धोधो पाऊस कोसळत आहे. त्यात सोमवार व मंगळवारी काजळेश्वर येथे मुसळधार पाऊस आला. या पावसामुळे उमा नदीला महापूर आला. नदी , नाल्याकाठच्या शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे नुकसान झाले. त्यात गावात सांडपाणी व पावसाचे पाणी वाहून जाण्याचे योग्य व्यवस्थापन नसल्याने गावातील सर्वच रस्त्यांवर पाणी तुंबून त्यांना नाल्याचे रूप प्राप्त झाले होते. ठिकठिकाणी पाणी तुंबल्यामुळे गावातच पूरसदृश स्थिती निर्माण झाल्याचा भास झाला. रस्त्यावर तुंबलेले पाणी अनेक ग्रामस्थांच्या घरात, गोठ्यात शिरले. यामुळे घराच्या भिंतीत पाणी मुरून काहींच्या घराची पडझडही झाली. सुदैवाने कोणती जीवितहानी झाली नसली तरी या प्रकारामुळे ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागला.
-----------------
गतवर्षीही घडला होता प्रकार
थोडाही मुसळधार पाऊस पडला की, काजळेश्वर येथील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी तुंबून राहते. यात शौचालयाचे, गटाराचे पाणी मिसळून ते ग्रामस्थांच्या घरात शिरते. गतवर्षीही मुसळधार पावसामुळे गावातील रस्त्यांना तलावाचे रूपच प्राप्त झाले होते. त्याची गंभीर दखल ग्रामपंचायतने घेतली नाही. त्यामुळे यंदाही त्या प्रकाराची पुनरावृत्ती झाली आहे.
००००००००००००००
साथरोग पसरण्याची भीती
गावात सांडपाणी व्यवस्थापन योग्य नसल्याने पावसाचे पाणीही रस्त्यावर तुंबून विषाणूंसह डासांच्या उत्पत्तीला वाव मिळत आहे. यामुळे गावात मलेरिया, डायरिया, विषमज्वरासह इतर साथीचे आजार पसरण्याची भीती निर्माण झाली असून, ढिसाळ नियोजनामुळे ग्रामपंचायतप्रती रोषाचे वातावरण निर्माण होत आहे.
-----
पाणी व्यवस्थापन, धूर फवारणीची मागणी
गत दोन दिवस आलेल्या संततधार पावसाने काजळेश्वर येथील रस्त्यांवर पाणी तुंबले असून, रस्त्यांना तलावाचे रूप आले आहे. यामुळे रोगराई पसरण्याची भीती असल्याने ग्रामपंचायत प्रशासनाने पाणी व्यवस्थापन व धूर फवारणी करावी, अशी मागणी प्रहार जनशक्ती संघटनेचे सेवक प्रदीप उपाध्ये, महादेव जाधव, सोनुभाई आदींनी केली आहे.