पावसाची रिपरिप थांबली, शेतकऱ्यांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:45 IST2021-08-24T04:45:15+5:302021-08-24T04:45:15+5:30
जिल्ह्यात यंदा ३ लाख ९७ हजार ६०७ हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी झाली असून, निसर्गाच्या लहरीपणाचा फटका या पिकांना ...

पावसाची रिपरिप थांबली, शेतकऱ्यांना दिलासा
जिल्ह्यात यंदा ३ लाख ९७ हजार ६०७ हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी झाली असून, निसर्गाच्या लहरीपणाचा फटका या पिकांना वारंवार बसत आहे. जूनमध्ये मध्यंतरी पावसाने खंड दिला, तर जुलैच्या मध्यंतरानंतर अतिवृष्टीचा फटका पिकांना बसला. ऑगस्ट महिन्यात पुन्हा पावसाचा खंड पडल्याने पिके संकटात सापडली होती. दरम्यान, गत आठवड्याच्या सुरुवातीपासून पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली. सुकू लागलेल्या पिकांना या दमदार पावसामुळे संजीवनी मिळाली; परंतु पावसाने पिच्छाच पुरविला. दरदिवशी पाऊस पडत असल्याने शेतात पाणी साचून पिके पिवळी पडण्यासह पिकांवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे शेतकरीवर्गांत चिंतेचे वातावरण होते. आता रविवारपासून पावसाने उसंत घेतली. त्यामुळे शेतकऱ्यांनी तण व्यवस्थापनाला वेग दिला असून, पिके चांगली बहरू लागली आहेत.
-----------------
सहा दिवसांत ७६ मि.मी. पाऊस
जिल्ह्यात सोमवार १६ ऑगस्ट ते शनिवार २१ ऑगस्टदरम्यान सहा दिवसांच्या कालावधीत ७६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सोमवारी दुपारपासून जिल्ह्यात हजेरी लावणाऱ्या पावसाने ठाणच मांडले आहे. दोन-तीन तासांची विश्रांती घेत पाऊस दरदिवशी सर्वत्र हजेरी लावत होता. त्यामुुळेच पावसाच्या सरासरीतही मोठी वाढ झाल्याचे हवामान खात्याच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
-----------------
पिकांच्या वाढीवर परिणाम
मागील आठवड्यात पाऊसमान जास्त झाल्याने शेतात पाणी साचले होते. पाणी साचल्याने जमीन घट्ट होण्यासह पिकांच्या मुळांना जमिनीतून अपटेक (जमिनीतून उपलब्ध खताचे/अन्नद्रव्ये सेवन) मिळणे अशक्य होते. परिणामी पिकांची वाढ खुंटून मूळ अतिपाण्यामुळे कुजून पिवळी पडण्यासह बुरशी वाढून पिके धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली होती.
-----------
कोट : पावसाने उसंत घेतल्याने आता पिके चांगली वाढणार आहेत. शेतकऱ्यांनी शेतात पाणी साचले असेल, तर ते तातडीने काढून पिकांत हवा खेळती राहील, यासाठी उपाय योजना कराव्यात.
- शंकर तोटावार,
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम.