कारवाईची वेळ येऊ देऊ नका!
By Admin | Updated: June 9, 2015 01:20 IST2015-06-09T01:20:09+5:302015-06-09T01:20:09+5:30
वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांचा कर्मचा-यांना इशारा.

कारवाईची वेळ येऊ देऊ नका!
वाशिम : गेल्या पंधरा दिवसांमध्ये बर्याच ठिकाणी पोलीस अधिकारी व कर्मचार्यांची कामामध्ये अनियतिता आढळून आली. यामुळे काही कर्मचार्यांवर निलंबनाची कारवाई करावी लागली. एवढेच नव्हे तर अवैध धंदे असो किंवा वाहतुकीचा प्रश्न असो, या ठिकाणी मला स्वत: लक्ष घालावे लागले. तथापि, अधिकारी व कर्मचार्यांनी आपले कर्तव्य प्रामाणिकतेने बजावून कारवाई करण्याची वेळ माझ्यावर येऊ देऊ नये, असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी ८ जून रोजी पत्रपरिषदेमध्ये केले. पोलीस अधीक्षक साहू यांनी २२ मे रोजी वाशिम पोलीस दलाची सूत्रे हाती घेतली. त्यानंतर साहू यांनी पत्रकार व प्रतिष्ठित नागरिकांसोबत चर्चा करून जिल्ह्यातील विविध समस्या जाणून घेतल्या. लगेच दुसर्या दिवशीपासून पोलीस अधीक्षकांनी स्वत: अख्खा जिल्हा पिंजुन काढला. २२ मे रोजी सर्वप्रथम रात्री-अपरात्री सुरू असणारे ढाबे, हॉटेल्स, चहा टपर्या व इतर व्यावसायिकांवर कारवाई करून श्रीगणेशा केला. पोलीस अधीक्षक साहू यांनी स्वत: केलेल्या या कारवाईमुळे जिल्हाभरात रात्री ११ वाजेनंतर शुकशुकाट निर्माण झाला. त्यानंतर छुप्यारितीने होत असलेल्या काही चोरट्यांचा शोध घेऊन त्यांनाही पोलिसी खाक्या दाखवून दिला. दरम्यान, पोलीस अधीक्षक साहू यांनी शहर व जिल्हा वाहतूक शाखेच्या अधिकार्यांना आपल्या कारवाईमध्ये प्रगती करण्याच्या सूचना दिल्या होत्या; परंतु शहर व जिल्ह्यातील वाहतूक पाहिजे त्याप्रमाणे नियंत्रित झाली नाही.