दिवाळीत व्यावसायिकांचे ‘दिवाळे’
By Admin | Updated: October 25, 2014 00:20 IST2014-10-25T00:18:38+5:302014-10-25T00:20:35+5:30
गतवर्षीच्या तुलनेत वाशिम जिल्ह्यात सर्वच क्षेत्रात उलाढाल कमी, पीकपरिस्थितीचा फटका.

दिवाळीत व्यावसायिकांचे ‘दिवाळे’
नंदकिशोर नारे, शिखरचंद बागरेचा / वाशिम
वाशिम : हिंदू संस्कृतीतील महत्त्वाचा सण दिवाळी. यादिवशी नवनवीन वस्तु खरेदी करण्याची परंपरा. याही दिवाळीत कोट्यवधींची खरेदी अपेक्षित असताना पीक परिस्थितीचा फटका या सणाला बसला. गतवर्षी २६ कोटी रूपयांची उलाढाल झाली, त्या तुलनेत यावर्षी नगण्य उलाढाल झाल्याचे व्यावसायिकांनी केलेल्या व्यवसायाच्या आकडीवारीवरून दिसून येते. दिवाळीत चांगला व्यवसाय होईल म्हणून विविध व्यावसायिकांनी आपल्या प्रतिष्ठानांमध्ये भरगच्च माल भरला; परंतु अपेक्षित व्यवसाय न झाल्याने या दिवाळीत व्यावसायिकांचे दिवाळे निघाल्याचे दिसून येत आहे.
पावसाच्या लहरीपणामुळे शेतकर्यांचे सोयाबीन पीक तसेच अन्य पिके उद्ध्वस्त झाली असून, सदर पीक परिस्थितीचा फटका सर्वच क्षेत्रातील उलाढालीवर झाला आहे. दसरा ,दिवाळीसारख्या महत्त्वपूर्ण असलेल्या सणासुदीच्या दिवसात उद्योग क्षेत्रात गतवर्षीच्या तुलनेत अत्यंत कमी प्रमाणात उलाढाल झाल्यामुळे ऐन दिवाळीत व्यावसायीकांचे दिवाळे निघाल्याचे चित्र आहे.
दसरा, दिवाळीच्या मुहूर्तावर सोने -चांदीचे आभुषण दागिने तसेच मोटार, कार, ट्रॅक्टर्स, दुचाकी, तीनचाकी वाहन व फ्रीज, मोबाईल, एलईडी, वॉशींग मशीन सोफासेट, आदी चैनीच्या वस्तुंचा माल व्यावसायीकांनी भरुन ठेवला होता.
सोयाबीन व अन्य रोख उत्पन्न देणार्या पिकांनी दगा दिल्यामुळे बळीराजा खरेदीसाठी बाजारात फिरकलाच नाही. नोकरदारांमुळे निदान २५ ते ३0 टक्के व्यवसाय झाल्याचे मत व्यापार्यांनी व्यक्त केले; मात्र आवश्यक असणार्या वस्तुंच खरेदी करण्याकडे सामान्य वर्गाचा कल होता.