- संतोष वानखडेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात २१ ते २३ जुलै दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे ३२०० हेक्टरवरील खरीप पिकांचे नुकसान झाले असून, २८८८ हेक्टरवरील नुकसानाचा सर्वे पूर्ण झाला. दुसरीकडे ४३३ हेक्टर जमीन खरडून गेली असून मंगळवारपर्यंत नुकसानभरपाई संदर्भात शासनाकडे अहवाल पाठविला जाण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.जिल्ह्यात मृग नक्षत्रात यापैकी बरसलेल्या पावसाने जूनच्या अखेरीस आणि जुलै महिन्याच्या सुरुवातीला दडी मारली होती. त्यामुळे पिके संकटात सापडली होती. दरम्यान, ११ जुलैपासून कमी-अधिक प्रमाणात जिल्ह्यात पाऊस बरसला. २१ ते २३ जुलै दरम्यान अतिवृष्टी झाल्याने खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले. मानोरा व मंगरूळपीर तालुक्यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नदीकाठावरील शेतातील पिकांचे सर्वाधिक नुकसान झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. महसूल व कृषी विभागातर्फे युद्धपातळीवर पंचनामे सुरू असून, आतापर्यंत २८८८ हेक्टरवरील पिकांचे पंचनामे पूर्ण झाले तर ३८८ हेक्टरवरील पिकांचे पंचनामे सोमवारपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अतिवृष्टीमुळे १० लहान व १० मोठी अशी एकूण २० जनावरे दगावली तर एका घराची पूर्णत: तर ४१ घरांची अंशत: पडझड झाल्याचे पंचनाम्यातून समोर आले. नुकसानग्रस्तांना भरपाई मिळावी याकरिता मंगळवारपर्यंत शासनाकडे अहवाल पाठविला जाण्याचा अंदाज आहे.
जिल्ह्यात २१ ते २३ जुलैदरम्यान अतिवृष्टी झाल्यामुळे काही भागात पिकांचे नुकसान झाले. नुकसानग्रस्त भागात पंचनामे केले जात आहेत. सोमवारपर्यंत पंचनामे पुर्ण होण्याची शक्यता असून, मंगळवारपर्यंत नुकसानभरपाई संदर्भातील अहवाल शासनाकडे पाठविला जाईल. - शैलेश हिंगेनिवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम