राजुरा येथे संपर्कातील व्यक्तीची कोरोना चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:43 IST2021-05-18T04:43:16+5:302021-05-18T04:43:16+5:30
गावात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून आले असताना प्रशासनाच्या वतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करून प्रतिबंधित क्षेत्राची प्रभावी अंमलबजावणी ...

राजुरा येथे संपर्कातील व्यक्तीची कोरोना चाचणी
गावात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून आले असताना प्रशासनाच्या वतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करून प्रतिबंधित क्षेत्राची प्रभावी अंमलबजावणी करणे गरजेचे असताना येथील उपाययोजना कागदावरच असल्याचे वास्तव दिसत होते. परिणामी येथील जनतेचे आरोग्य धोक्यात आले होते. ज्या भागात कोरोनाबाधित रुग्ण आढळतो तो भाग शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सील करून तसा फलक कोरोनाबाधितांच्या घराजवळ लावण्यात गरजेचे आहे. पाचपेक्षा अधिक रुग्ण आढळून आल्यास प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यात येतो. मात्र येथील कोरोनाबाधितांच्या घरातील व संपर्कातील नागरिक बिनबोभाट खुलेआम गावामध्ये फिरत आहेत. दि. ७ मे रोजी कोरोनाबाधित आलेल्या एका ३५ वर्षीय युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने ग्रामस्थामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सद्यस्थितीत गावातील बऱ्याच नागरिकांची गावाबाहेर नियमितपणे ये-जा सुरू आहे, तर बाहेरगावच्या व्यक्तीसह छोटे-मोठे व्यवसाय करणारेही मोठ्या प्रमाणात गावात येत असल्याने कोरोना संक्रमण कमी होण्याऐवजी अधिक प्रमाणात वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोरोना संक्रमणाची साखळी खंडित करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार प्रतिबंधात्मक क्षेत्राची काटेकोरपणेप्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. शिवाय आरोग्य यंत्रणेच्या वतीने कोरोना चाचण्यांचा वेग वाढविणे अत्यंत गरजेचे ठरत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी फिजिकल डिस्टन्स नियमाचे पालन करत नियमितपणे मास्क वापरून प्रशासनाला सहकार्य करण्याची सुद्धा नितांत गरज आहे. कोरोना चाचणी दरम्यान आरोग्यसेविका जयश्री धांदू, आरोग्यसेवक अंनिस कुरेशी, आशा स्वयंसेविका वंदना हिवराळे, रेखा सोनोने यांची उपस्थिती होती.
बॉक्स
हायरिस्क संपर्कातील व्यक्तीची कोरोना चाचणी घेण्यात आली. नागरिकांनी कोरोनाविषयक नियमांचे पालन करत नियमितपणे मास्क वापरून प्रशासनाला सहकार्य करण्याची गरज आहे. चाचणीचा वेग वाढविण्यात येईल.
अनिस कुरेशी, आरोग्यसेवक, राजुरा
..
बॉक्स
गावात साथरोगाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून खबरदारीच्या आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. नागरिकांनी नियमांचे पालन करत प्रशासनाला सहकार्य करावे.
यशोदाबाई रवणे
सरपंच, राजुरा