काँग्रेस, राकाँ नेत्यांचे वागणे नटसम्राटासारखे
By Admin | Updated: October 9, 2014 01:48 IST2014-10-09T01:46:36+5:302014-10-09T01:48:29+5:30
नितीन गडकरी यांची अकोट येथील जाहीरसभेत टीका

काँग्रेस, राकाँ नेत्यांचे वागणे नटसम्राटासारखे
आकोट : निवडणुका आल्या की काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नटसम्राटासारखे वागतात. नाटकातील भाडोत्री पात्राप्रमाणे शाहू, फुले, आंबेडकरांची नावं घेत सहानुभूतीच्या आधारावर सत्ता मिळवतात. मग मात्र जनतेची लूट करीत असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला.
आकोट येथे भाजपच्या प्रचार सभेत बोलताना गडकरी म्हणाले, काँग्रेस, राकाँमध्ये घराणेशाही आहे; परंतु भाजपमध्ये घराणेशाहीला पायबंद घातला जात आहे. भाजपची भूमिका दहशतवाद, भ्रष्टाचार व पाकिस्तानच्या विरोधात आहे; मात्र, काँग्रेस-राकाँची मंडळी मोदींचा अपप्रचार करून मुस्लीम समाजाला भीती दाखवित आहेत. आघाडी सरकारने कोट्यवधी रुपये सिंचनावर खर्च केले; परंतु सिंचन झाले नाही. आकोट तालुक्यात सिंचनाचा पैसा नेमका कुणी खाल्ला, हा संशोधनाचा विषय आहे. पंडित नेहरूंपासून काँग्रेस गरिबी हटावचा नारा देत आहे; परंतु राहुल गांधींपर्यंतही गरिबी हटली नाही. उद्योगधंदे व प्रगती नसल्याने मोठय़ा प्रमाणात बेरोजगार निर्माण झाल्याचा आरोप गडकरी यांनी केला.
व्यासपीठावर खासदार संजय धोत्रे, आमदार रणजित पाटील, संघटन मंत्री रामदास आंबटकर, प्रकाश भारसाकळे, संतोष झुनझुनवाला, नयना मनतकार, डॉ. जगन्नाथ ढोणे, राजू नागमते, योगेश नाठे, संदीप उगले, माजी नगराध्यक्ष पुरुषोत्तम चौखंडे, तेल्हारा नगराध्यक्ष कान्होपात्रा फाटकर, नानासाहेब भिसे, नलिनी भारसाकळे, रूपाली भारसाकळे, ओम सुईवाल, रमेश दुतोंडे, स्मिता राजनकर, हाजी आरीफ हुसेन मुल्लाजी, डॉ. गजानन महल्ले, जयंत पोटे, बाळासाहेब भांडे व भाजपचे जि.प., पं.स., न.प. सदस्यांची उपस्थिती होती.