काँग्रेसने ओबीसी समाजाचा विश्वासघात केला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:45 IST2021-09-25T04:45:38+5:302021-09-25T04:45:38+5:30
वाशिम : काँग्रेसचे राज्यसभा खासदार राजीव सातव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर त्यांची पत्नी प्रज्ञा सातव यांना उमेदवारी मिळायला ...

काँग्रेसने ओबीसी समाजाचा विश्वासघात केला
वाशिम : काँग्रेसचे राज्यसभा खासदार राजीव सातव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर त्यांची पत्नी प्रज्ञा सातव यांना उमेदवारी मिळायला हवी होती. मात्र, काँग्रेसने उमेदवारी नाकारून ओबीसी समाजाचा विश्वासघात केला. ओबीसी समाज, वंचित बहुजन आघाडी व माळी समाज त्याचा निषेध करित आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय माळी महासंघाच्या राष्ट्रीय महिला अध्यक्ष तथा वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश सदस्य किरण गिऱ्हे यांनी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत केले.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे डॉ. सिध्दार्थ देवळे व जिल्हा सचिव सोनाजी इंगळे यांच्यासह माळी कर्मचारी सेवा मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. काँग्रेसचे दिवंगत राज्यसभा खासदार राजीव सातव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर त्यांची पत्नी प्रज्ञा यांना उमेदवारी मिळण्याची आशा ओबीसी समाजातून व्यक्त केली जात होती, मात्र काँग्रेसने सातव यांच्या पत्नीला उमेदवारी नाकारून रजनी पाटील यांना उमेदवारी दिली. प्रज्ञा सातव यांना उमेदवारी मिळू नये, यासाठी काँग्रेस नेत्यांनी दिल्लीत ‘लॉबिंग’ केले. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व छगन भुजबळ यांच्यासारखे ओबीसी नेते असताना रिक्त झालेल्या पदावर ओबीसी उमेदवार देऊ शकले नाही, याबाबत गिऱ्हे यांनी खंत व्यक्त केली. या बाबीचा अ.भा.माळी महासंघ तथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निदर्शने व आंदोलन करून नाराजी व्यक्त करण्यात येणार असल्याचे त्या म्हणाल्या.