थंडीचा कडाका वाढला; साथरोग बळावले!
By Admin | Updated: January 26, 2016 02:23 IST2016-01-26T02:23:41+5:302016-01-26T02:23:41+5:30
वातावरणातील बदलाचा परिणाम; रुग्णालयात रुग्णांची गर्दी.

थंडीचा कडाका वाढला; साथरोग बळावले!
वाशिम: थंडीचा कडाका आणि वातावरणातील बदलामुळे सर्दी, खोकला, डोकेदुखी, ताप आदी साथरोगाने डोके वर काढले असून, जिल्हय़ातील नागरिक हैराण झाले आहेत. उपचारार्थ शेकडो रुग्ण सरकारी व खासगी दवाखान्यात दाखल होत आहेत. गत चार दिवसांपासून वातावरणात अचानक गारवा आल्याने नागरिकांचे आरोग्य बिघडत चालले आहे. २0१५ या वर्षात पावसाळ्यात फारसा पाऊस झाला नसल्यामुळे गॅस्ट्रो, डायरिया आदी आजारांची लागण झाली नाही; मात्र गत चार-पाच दिवसांपासून वातावरणात प्रचंड बदल होत असल्याने सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी, डोकेदुखी, प्लेटलेट कमी होणे, विषमज्वर आदी आजारांना नागरिक बळी पडत असल्याचे दिसून येते. हिमवृष्टीनंतर उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणार्या शीत वार्याने पुन्हा एकदा जोर पकडल्याने वाशिमसह अख्खे राज्य कुडकुडले आहे. पहाटेपासूनच थंडी जाणवत आहे. सायंकाळी ६ वाजेनंतर अधिकच थंडी वाढते. पाच दिवसांपूर्वी रात्री जिल्ह्याचे तापमान १७ डिग्री सेल्सिअसपेक्षा अधिक होते. तीन दिवसांपासून तापमान १३ डिग्री सेल्सिअसपर्यंत खाली आले. वाढत्या थंडीमुळे जिल्हावासी वैतागले आहेत. थंडीपासून बचाव म्हणून स्वेटर, ऊबदार कपडे पुन्हा बाहेर निघाले असल्याचे दिसून येते. कडाक्याच्या थंडीमुळे वातावरणात अचानक बदल झाल्याने सर्दी, खोकला, ताप, प्लेटलेट कमी होणे आदी प्रकाराच्या आजाराने डोके वर काढले. बालके आणि वयोवृद्ध विविध प्रकारच्या आजारांना बळी पडत असल्याचे दिसून येते. विशेषत: लहान बालकांना ही थंडी अधिकच असह्य ठरत आहे. बालकांची रोगप्रतिकारक्षमता कमी असल्यामुळे सर्दी, खोकला यासारख्या आजारांचे आक्रमण लवकर होते. बालकांप्रमाणेच वृद्धांचीही हीच अवस्था आहे. उतारवयामुळे त्यांनादेखील थंडी असह्य होते. सर्दी, खोकला, डोकेदुखीसारखे आजार जडत आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयात साधारणत: दररोज ३00 ते ४00 नागरिक विविध आजारांच्या तपासणीसाठी येत आहेत. खासगी दवाखान्यातही रुग्णांची संख्या वाढत असल्याने दवाखाने हाऊसफुल्ल असल्याचे दिसून येते.