शहर वाहतुकीची घडी विस्कटली
By Admin | Updated: September 7, 2014 22:46 IST2014-09-07T22:46:19+5:302014-09-07T22:46:19+5:30
मंगरुळपीर येथील वाहतुक व्यवस्था विस्कळीत; पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष.

शहर वाहतुकीची घडी विस्कटली
मंगरुळपीर :शहरातील वाहतूक व्यवस्थेची घडी पूर्णपणे विस्कटली असून, सर्वच मुख्य चौकांत बेलगाम वाहतुकीमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पोलिस प्रशासनाचे मात्र त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याचे दिसते.
मंगरुळपीर शहरातील रस्त्यांची रूंदी आधीच कमी असताना खासगी वाहनांच्या वर्दळीसह रस्त्याच्या दूतर्फा झालेल्या अतिक्रमणामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम होत आहे. अकोला चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, बसस्थानक, वीर भगत सिंग चौक आदि दुचाकी, चार चाकी वाहनांची मोठय़ा वर्दळ असते. या चौकांत बहुतेक वाहने बेशिस्तपणे उभी करण्यात आलेली दिसतात. अकोला चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, बसस्थानक आदि ठिकाणी खासगी प्रवासी वाहने रस् त्यावरच उभी करण्यात येतात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन इतर वाहनांसह पादचार्यांनीही मोठय़ा अडचणींचा सामना करावा लागतो. खासगी प्रवासी वाहनांच्या बेशिस्तीमुळे अनेकदा किरकोळ अपघाताच्या घटना घडून वादही उद्भवले आहेत. या प्रकाराला आळा घालण्यात आला नाही, तर एखाद वेळी येथे मोठा अपघात घडून जीवितहानी होण्याची शक्यता मुळीच नाकारता येत नाही. वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी नागरिकांकडून अनेकदा निवेदनही देण्यात आले आणि त्यावर कारवाईही करण्यात आली; परंतु थोड्याच दिवसांत परिस्थिती ह्यजैसे थेह्ण झाली. त्यामुळे पोलिस प्रशासनाचा जनतेवर मुळीच वचक नसल्याचे दिसत आहे. अकोला चौक हा शहरातील मुख्य चौक असून, या ठिकाणी प्रवासी निवाराही आहे. या प्रवासी निवार्याचा वापर इतर बाबींसाठी अधिक होत असला तरी, अकोला, कारंजाश्, वाशिम, मानोरा आदि ठिकाणी जाणार्या येणार्या बसेस येथे थांबतात. त्यामुळे येथे सतत मोठय़ा प्रमाणात वर्दळ असते. या ठिकाणच्या वाहतुकीवर पोलिसांचे मुळीच नियंत्रण नाही. चौकात सर्वत्र चार चाकी, दूचाकीेंसह ऑटोरिक्षा बेतालपणे उभ्या केल्या जातात. त्यामुळे बसमधून चढण्या उतरण्यासाठी प्रवाशांना धड जागाही राहत नाही. याकडे पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष असल्यामुळे नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येते. मुख्य चौकांमधील बेलगाम वाहतुकीवर नियंत्रण मिळविले नाही, तर एखाद वेळी मोठी घटना घडेल आणि त्यासाठी प्रशासनच जबाबदार असेल. त्यामुळे यावर त्वरीत उपाय योजना कराव्या, अशी मागणी जनतेकडून करण्यात येत आहे.