वातावरणात बदल; साथरोगाने जिल्हा फणफणला!
By Admin | Updated: September 6, 2016 01:54 IST2016-09-06T01:54:30+5:302016-09-06T01:54:30+5:30
सर्दी, ताप, खोकल्याने नागरिक त्रस्त, सरकारी व खासगी दवाखाने हाऊसफुल.
_ns.jpg)
वातावरणात बदल; साथरोगाने जिल्हा फणफणला!
वाशिम, दि. ५ : वातावरणातील बदलामुळे सर्दी, खोकला, डोकेदुखी, ताप आदी साथरोगाने डोके वर काढले असून, उपचारार्थ शेकडो रुग्ण सरकारी व खासगी दवाखान्यात दाखल होत आहे. ढगाळ वातावरण आणि ऊन, सावलीच्या खेळात नागरिकांचे आरोग्य बिघडत चालले आहे. गत एक महिन्यापासून वातावरणात प्रचंड बदल होत असल्याने सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी, प्लेटलेट कमी होणे, विषमज्वर आदी आजार नागरिकांना जडत असल्याचे दिसून येते. या विषाणूजन्य तापासोबत लहान मुलांना सर्दी, खोकल्याचा जबर त्रास सहन करावा लागत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात साधारणत: दररोज ४५0 ते ५५0 नागरिक विविध आजारांच्या तपासणीसाठी येत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. खासगी दवाखान्यातही रुग्णांची गर्दी होत आहे. वातावरणातील बदल लहान बालक आणि वयोवृद्ध नागरिकांना शक्यतोवर सहन होत नाहीत. परिणामी, लहान मुले आणि वयोवृद्ध नागरिक आजाराला बळी पडण्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे दिसून येते. लहान बालकांना सर्दी, ताप व खोकला या आजाराने ग्रासले असल्याचे रुग्ण संख्येवरून दिसून येते. सामान्य रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालयात दररोज किमान १५0 ते १८0 बालकांना तपासणीसाठी आणले जात असल्याचे दिसून येते. ग्रामीण व शहरी भागातील खासगी रुग्णालयात ताप, अंगदुखी, सर्दी, खोकला, विषमज्वर अशा रुग्णांची कमालीची गर्दी होऊ लागली. त्यातच काही प्रमाणात हिवतापाचेही रुग्ण रुग्णालयांमध्ये दाखल होऊ लागले.