प्रमुख पक्षांसमोर बंडखोरी शमविण्याचे आव्हान

By Admin | Updated: August 25, 2014 01:56 IST2014-08-25T01:37:56+5:302014-08-25T01:56:13+5:30

वाशिम जिल्ह्यातील इच्छुकांची काढावी लागणार समजूत; बंडखोरीवर नियंत्रणासाठी पक्षांना करावी लागणार कसरत.

Challenge of rebellion against major parties | प्रमुख पक्षांसमोर बंडखोरी शमविण्याचे आव्हान

प्रमुख पक्षांसमोर बंडखोरी शमविण्याचे आव्हान

दादाराव गायकवाड / वाशिम
वाशिम: जिल्हय़ातील कारंजा, वाशिम आणि रिसोड तीनही विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वच राजकीय पक्षाच्या इच्छुक उमेदवारांची भाऊगर्दी झाल्यामुळे तिकीट वाटपाचा पेच निर्माण झाला असून, उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नाराजांच्या संभाव्य बंडखोरीला आळा घालण्यासाठी राजकीय पक्षांना चांगलीच कसरत करावी लागणार आहे.
विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागण्यापूर्वीच इच्छुक उमेदवारांनी तिकिटासाठी हालचाली सुरू केल्या होत्या. त्यांच्याकडून आपापल्या परीने दावेदारीही करण्यात आली. जिल्हय़ातील तिन्ही मतदारसंघात आणि सर्वच प्रमुख राजकीय पक्षांत अशा इच्छुकांची भाऊगर्दी झाल्यामुळे पक्षश्रेष्ठींपुढे तिकीट वाटपाचा पेच निर्माण झाला आहे. इच्छुक उमेदवारांमध्ये आजी-माजी आमदारांसह नवख्यांचाही समावेश असून, प्रत्येक इच्छुक पक्षश्रेष्ठीमधील आपल्या पाठीराख्याकडून स्वत:ची बाजू मजबूत करण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळे तिकीट द्यायचे तरी, कोणाला, हा प्रश्न गंभीर रूप धारण करू लागला आहे. सर्व प्रकारचे प्रयत्न करूनही तिकीट मिळाली नाहीच, तर नाराज झालेले काही इच्छुक बंडखोरीचे हत्यार उपसणार हेसुद्धा निश्‍चित आहे. या बंडखोरीला आळा घालण्यासाठी सर्वच प्रमुख पक्षांना चांगलीच कसरत करावी लागणार आहे.
जिल्हय़ातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे ४२, राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने १२, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने १२, भाजपाच्यावतीने १५ उमेदवार निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. महायुतीमधील घटकपक्ष शिवसेनेकडे असलेल्या कारंजा विधानसभा मतदारसंघांत त्यांच्यावतीने १५ जण इच्छुक आहेत. वाशिम व रिसोड विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेतर्फे इच्छुकांचे नाव पुढे आले नसल्याची माहिती आहे. जिल्हय़ातील सध्याच्या स्थितीनुसार वाशिम आणि रिसोड मतदारसंघ संपुआमधील काँग्रेसकडे, तर हेच दोन मतदारसंघ महायुतीमधील मुख्य घटकपक्ष असलेल्या भाजपकडे आहेत. कारंजा मतदारसंघ महायुतीमधील शिवसेनेकडे, तर संपुआमधील राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहेत. इच्छुकांची संख्या लक्षात घेतल्यास वाशिम मतदारसंघात काँग्रेसचे सर्वाधिक ३२, तर तर त्या खालोखाल भाजपचे ७ उमेदवार आहेत. त्यामुळे या मतदारसंघात या दोन पक्षांनाच नाराजांचा अधिक सामना करावा लागेल. कारंजा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे सर्वाधिक १५, तर त्या खालोखाल काँग्रेसचे ८ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ५ उमेदवार आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला सुटला असताना त्यांचे मात्र ५ इच्छुक आहेत. रिसोड मतदारसंघ संपुआमधील काँग्रेसच्या वाट्यावर असून, या मतदारसंघात त्यांचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी दोन उमेदवार, तर भाजपचे तीन इच्छुक उमेदवार आहेत.

Web Title: Challenge of rebellion against major parties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.