दर करार खरेदीवर शिक्कामोर्तब!
By Admin | Updated: February 13, 2016 02:01 IST2016-02-13T02:01:48+5:302016-02-13T02:01:48+5:30
वाशिम जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्याचा एकमुखी ठराव.

दर करार खरेदीवर शिक्कामोर्तब!
वाशिम: दर करार (आरसी) की ई-निविदेद्वारे साहित्य खरेदी, यावरून जिल्हा परिषदेत रंगलेल्या नाट्यावर अखेर शुक्रवारच्या सर्वसाधारण सभेत पडदा पडला. कृषी, समाजकल्याण यासह अन्य विभागांची साहित्य खरेदी ही बाजार दराशी तुलना केल्यानंतर शासनाच्या दर करारानुसार करण्याचा एकमुखी ठराव पारित झाला. जिल्हा परिषदेच्या वसंतराव नाईक सभागृहात पार पडलेल्या सभेला जिल्हा परिषद अध्यक्ष सोनाली जोगदंड, उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी के.एम. अहमद, सभापती चक्रधर गोटे, सुभाष शिंदे, ज्योती गणेशपुरे, पानुताई जाधव यांच्यासह सदस्य व विभागप्रमुखांची उपस्थिती होती. सुरुवातीलाच जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळांची दुरवस्था व रिक्त पदे यावर चर्चा झाली. जि.प. सदस्य हेमेंद्र ठाकरे यांनी विठोली जिल्हा परिषद माध्यमिक शाळेच्या दुरवस्थेचा प्रश्न उपस्थित केला. ही शाळा वाचविण्यासाठी शिक्षकांची रिक्त पदे भरण्याची मागणी केली. सदर पदे कशा पद्धतीने भरता येतील, याबाबत उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, चक्रधर गोटे, देवेंद्र ताथोड, उस्मान गारवे यांनी चर्चेत सहभाग घेतला. हा प्रश्न तातडीने निकाली काढण्याच्या सूचना गणेश पाटील यांनी शिक्षणाधिकार्यांना केल्या. विविध विभागाच्या साहित्याची खरेदी ई-निविदा की दर कराराने करायची यावर चर्चा झाली. बाजारभावातील दराशी दर कराराची पडताळणी करून, कमी दराने साहित्य पुरवठा करणार्या कंत्राटदाराकडून दर कराराने साहित्य खरेदी करण्याला सभागृहाने मान्यता दिली. जि.प. सदस्य रत्नप्रभा घुगे यांनी शेतकर्यांच्या धुर्यावर सामूहिक पद्धतीने तार कुंपण देण्याचा मुद्दा उपस्थित केला; मात्र यासाठी ठोस निधी उपलब्ध नसल्याने तार कुंपण देण्यात अडचणी येण्याची शक्यता संबंधित विभागाने वर्तविली. यावर हेमेंद्र ठाकरे यांनी सर्वांना खरोखरच तळमळ असेल तर शिल्लक असलेला पाच कोटी ८६ लाखांचा निधी तार कुंपण या शीर्षकाखाली वळता करता येऊ शकतो, असा उपाय सुचविला.