भरारी पथकांची कृषी सेवा केंद्रांवर करडी नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:31 IST2021-05-30T04:31:29+5:302021-05-30T04:31:29+5:30

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल झाला असून ढगाळी वातावरण कायम राहत आहे. पावसाळ्याला वेळेतच सुरुवात होईल, असे गृहीत ...

Bharari squads keep a close eye on agricultural service centers | भरारी पथकांची कृषी सेवा केंद्रांवर करडी नजर

भरारी पथकांची कृषी सेवा केंद्रांवर करडी नजर

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल झाला असून ढगाळी वातावरण कायम राहत आहे. पावसाळ्याला वेळेतच सुरुवात होईल, असे गृहीत धरून शेतकऱ्यांनी रासायनिक खते व बियाणे खरेदी करण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. दरम्यान, या वर्षी युरिया वगळता इतर सर्व रासायनिक खतांच्या किमतीत वाढ झाली होती; मात्र केंद्र शासनाने खतावरचे अनुदान वाढविल्याने विविध कंपन्यांमध्ये उत्पादित होणाऱ्या रायानिक खतांचे दर कमी झाले असून नवे दर जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोणत्याच कृषी सेवा केंद्राने जादा दराने खतविक्री करू नये; अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा कृषी विभागाकडून देण्यात आला आहे. त्यानुषंगाने खत विक्री प्रक्रियेवर भरारी पथकाचे लक्ष असणार आहे.

खताची गुणवत्ता व दर्जा उत्तम असल्याची हमी देऊन भेसळीद्वारे शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता आहे. कृषी सेवा केंद्रांनी हा प्रकार कदापि करू नये. शेतकऱ्यांनीही रासायनिक खत विक्रेत्यांकडे असलेल्या ई-पॉस मशीनद्वारे मिळालेली खत खरेदीची पावती जपून ठेवावी. त्यावरून रासायनिक खताच्या किमतीची पडताळणी करता येईल, अशी सूचना देण्यात आली आहे.

...............

ऐन हंगामात ‘डीएपी’चा तुटवडा

१ मेपासून रासायनिक खतांच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. गतवर्षी १२०० रुपयांना मिळणारी गोदावरी डीएपी खताची गोणी १९०० रुपयांवर पोहोचली होती. त्यामुळे शेतकरी ‘गोदावरी’ची मागणी करणार नाहीत, हे गृहीत धरून कृषी सेवा केंद्रांनी डीएपी कमी व २०:२०:०:१३ खताचा अधिक साठा केला. २० मेपासून मात्र डीएपीचे दर उतरून १२०० झाले. त्यामुळे शेतकऱ्यांकडून याच खताची मागणी केली जात आहे; मात्र या खताचा तुटवडा निर्माण झाल्याने शेतकऱ्यांसोबतच कृषी सेवा केंद्रांचे चालकही वैतागले आहेत.

.......................

कोट :

जिल्ह्यात गोदावरी डीएपीला पर्याय म्हणून इतर मिश्र खतांचा १३०० मे. टन साठा उपलब्ध आहे. विशेष म्हणजे हे खत दिल्याने उत्पन्नात कुठलीच कमी येणार नाही; मात्र शेतकऱ्यांकडून ‘डीएपी’चाच अट्टहास धरला जात आहे. कच्चा मालाची कमतरता आणि इतर कारणांमुळे आणखी काही दिवस गोदावरी डीएपी उपलब्ध होण्याची शक्यता कमीच आहे.

- विकास बंडगर,

कृषी विकास अधिकारी, जि.प., वाशिम

Web Title: Bharari squads keep a close eye on agricultural service centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.