लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : गेल्या चार महिन्यांत पेट्रोल, डिझेलच्या दरात मोठी वाढ झाली असून, पेट्रोलचे दर ९५ रुपये प्रतिलिटर, तर डिझेलचे दर ८३ रुपये प्रतिलिटरवर पोहोचले आहेत. या इंधन दरवाढीचा फटका ऑटोरिक्षा चालविणाऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. अपेक्षित कमाई होत नसल्याने अनेकांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी पर्यायी रोजगार शोधले आहेत.वाशिम जिल्ह्यात रोजगाराची समस्या गंभीर आहे. उद्योगांची वाणवा असल्याने ५० टक्क्यांहून अधिक कामगारांना शेतीकामाचा आधार घ्यावा लागतो, तर हजारो लोक ऑटोरिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. दिवसभर बसस्थानक, शहरांतील मुख्य चौकात तासन्तास प्रवाशांची वाट पाहणे किंवा ग्रामीण भागांत नियमानुसार प्रवासी वाहतूक करण्यासाठी ऑटोरिक्षाचालकांची मोठी धडपड होत असल्याचे चित्र दरदिवशी पाहायला मिळते. त्यात कोरोनामुळे केलेल्या लॉकडाऊन काळात ऑटोरिक्षाचालकांचा व्यवसाय पूर्णपणे बंद होता. आता तो सुरळीत होण्यापूर्वीच शासनाकडून पेट्रोल, डिझेलच्या दरात मोठी वाढ केली जात आहे. त्यामुळे रिक्षाचालकांना पूर्वीच्या दरात प्रवाशांची वाहतूक करणेच परवडणारे राहिले नाही. जिल्ह्यात ऑटोरिक्षांची संख्या ७६९० झाल्याने प्रवासी मिळणे कठीण होते. त्यामुळे या रिक्षाचालकांना आता ऑटोरिक्षा चालविणेच कठीण झाले आहे. दिवसभर ऑटो फिरवून २०० रुपयेसुद्धा कमाई होत नसल्याने अनेकांनी पर्यायी रोजगार शोधले आहेत. त्यात काहींनी भाजीपाला विक्रीचा व्यवसायही सुरू केला आहे.
दरवाढीमुळे व्यवसाय कठीणबसस्थानकाहून जवळपास एक, दोन किलोमीटरच्या अंतरासाठी प्रतिप्रवासी दहा रुपये भाडे ऑटोरिक्षाचालक घेतात. अशीच स्थिती जिल्हाभरात आहे. तथापि, एवढ्या अंतरात दोन प्रवासी घेऊन गेल्यानंतर परत प्रवासी मिळणे कठीण होते.
दिवसभरात २०० रुपये कमाई पेट्रोल, डिझेलचे दर वाढल्याने ऑटोरिक्षाचालकांना परवडणारे राहिले नाही. पूर्वी दिवसभर ऑटो चालविल्यानंतर त्यांना ४०० रुपयांपर्यंत कमाई होत असे; परंतु आता मात्र २०० रुपये कमाई होणेही कठीण आहे.