माकडाच्या मृत्यूनंतर गावकरी दहशतीतून मुक्त
By Admin | Updated: January 1, 2015 01:53 IST2015-01-01T01:33:09+5:302015-01-01T01:53:55+5:30
बंदूक, लाठय़ा-काठय़ा घेऊन संपूर्ण गावक-यांनी घेतला शोध.

माकडाच्या मृत्यूनंतर गावकरी दहशतीतून मुक्त
महादेव जऊळकार /अनसिंग (वाशिम)
गत एक महिन्यापासून २५ हजार लोकसंख्या असलेल्या गावाला सडो की पडो करून सोडणार्या माकडाच्या मृत्यूनंतर दहशतीत वावरणारे गावकरी मुक्त झालेत. गावातील एक हजाराच्यावर ग्रामस्थांनी आज ३१ डिसेंबर रोजी सकाळपासूनच माकडाचा शोध घेऊन त्यास ठार केले.
गत एक महिन्याआधी एका माकडाची टोळी गावात आली. या टोळीमधील एक माकड येथेच राहून गेले. अनेक दिवस व्यवस्थित वागणूक असलेल्या या माकडाला काही नागरिकांनी त्रास दिला. त्यानंतर हिंसक झालेल्या या माकडाने तब्बल २५ ग्रामस्थांना चावा घेऊन जखमी केले. यामधील दोन जण आजही गंभीर अवस्थेत असून, अकोला येथे मृत्यूशी झुंज देत आहेत. ३0 दिवसात २५ जणांना चावा घेणार्या व गावात दहशत निर्माण करणार्या माकडाचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभाग, पोलीस विभागासह गावकरी भिडले; मात्र असफल ठरले. यासाठी गावकर्यांनी संपूर्ण गावही बंद ठेवले. मात्र त्याचाही फायदा झाला नाही. गावात कोणीही फिरताना, विद्यार्थी शाळेत जाताना धजावत नव्हते. या माकडाचा बंदोबस्त कसा करावा, याबाबात संपूर्ण गाव विचार करीत असताना आज जवळपास एक हजाराच्यावर नागरिक हातात लाठय़ा-काठय़ा घेऊन माकडाच्या शोधात निघाले. सोबत वनविभागाचे कर्मचारीही बंदुका घेऊन होते. माकड ३१ डिसेंबर रोजी गावात असलेल्या एका दाल मिलमध्ये शिरल्याची माहिती नागरिकांना पडताच त्यांनी संपूर्ण मिलला वेढा घातला व दरवाजा बंद करून टाकला. माकड असलेल्या खोलीमध्ये नागरिकांसह वनविभागाने एकत्र प्रवेश करून माकडावर हाती येईल त्या वस्तूंनी मारा करून त्यास ठार केले. गत एक महिन्यापासून दहशतीत असलेल्या गावकर्यांना अखेर वानराच्या मृत्यूनंतर दहशतीतून मुक्तता मिळाली.