प्रशासकीय अनास्था, रस्त्याची झाली दैनावस्था!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:45 IST2021-09-25T04:45:03+5:302021-09-25T04:45:03+5:30
वाशिम : रिसोडवरून मालेगावकडे जाणाऱ्या बिबखेडपर्यंतच्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. प्रशासकीय अनास्थेमुळे उद्भवलेल्या या प्रश्नाने ग्रामस्थ वैतागले ...

प्रशासकीय अनास्था, रस्त्याची झाली दैनावस्था!
वाशिम : रिसोडवरून मालेगावकडे जाणाऱ्या बिबखेडपर्यंतच्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. प्रशासकीय अनास्थेमुळे उद्भवलेल्या या प्रश्नाने ग्रामस्थ वैतागले आहेत. याप्रकरणी भूमिपुत्र शेतकरी संघटनेने आक्रमक पवित्रा अंगीकारला असून २४ सप्टेंबर रोजी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णूपंत भुतेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याकडे कैफियत मांडण्यात आली.
रिसोडवरून मालेगावकडे जाणारा रस्ता बिबखेड गावापर्यंत मोठ्या प्रमाणात खराब झाला आहे. तालुक्याला जोडलेल्या सुमारे ५० गावांमधील नागरिक या रस्त्याने नियमित ये-जा करतात. तसेच अकोला, मालेगाव जाण्यासाठी रिसोडवरून हाच एकमेव राष्ट्रीय महामार्ग आहे. मालेगावपासून रिसोडपर्यंतच्या रस्त्याचे ९० टक्के काम सध्या पूर्ण झाले. केवळ रिसोडला लागून असलेल्या बिबखेड गावापासून रिसोडपर्यंतचा अंदाजे तीन किलोमिटरचा रस्ता प्रलंबित राहिला आहे. नेमक्या याच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाले असून पायदळही चालता येणे अशक्य झाले आहे.
असे असताना समस्या निकाली काढण्याऐवजी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभाग सातत्याने एकमेकांकडे अंगुलीनिर्देश करून चालढकल करित असल्याचे विष्णूपंत भुतेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. दरम्यान, मोठमोठे खड्डे आणि त्यात साचत असलेल्या पावसाच्या पाण्यामुळे हा रस्ता पूर्णत: बंद पडण्याच्या स्थितीत आला आहे. सोयाबीनचा हंगाम सुरू झाला असून शेतकऱ्यांना रिसोड बाजारपेठेत माल नेता येणे यामुळे अशक्य होणार आहे. याप्रकरणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित कार्यवाही करून प्रश्न न सोडविल्यास येत्या गुरुवार, ३० सप्टेंबर रोजी ‘भूमिपुत्र’ रास्ता रोको आंदोलन करणार, असा इशाराही विष्णूपंत भुतेकर यांनी दिला.