६९0 कृषी पंप जोडणी रखडली!
By Admin | Updated: January 6, 2016 01:54 IST2016-01-06T01:54:13+5:302016-01-06T01:54:13+5:30
विशेष घटक योजने अंतर्गत कृषी समितीच्या ठरावालाही महावितरणकडून केराची टोपली.

६९0 कृषी पंप जोडणी रखडली!
संतोष वानखडे / वाशिम: बिलाच्या थकीत रकमेपोटी तातडीने कृषी पंप जोडणीचा दंडुका उगारणारी वीज वितरण कंपनी कर्तव्याच्या बाबतीत मात्र गाढ झोपी असल्याची बाब कृषी पंप जोडणीच्या विलंबाने उजेडात आली आहे. चार वर्षानंतरही वीज वितरण कंपनीला विशेष घटक योजनेंतर्गतचा कृषी पंप जोडणीचा ६0 टक्के आकडाही गाठता आला नाही. दारिद्रय़रेषेखाली जीवन जगणार्या अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकर्यांचे जीवनमान उंचाविण्याच्या दृष्टिकोनातून १९८२ पासून राज्यातील सर्व जिल्हय़ांमध्ये विशेष घटक योजना राबविली जात आहे. या योजनेंतर्गत नवीन विहिरीसह विविध प्रकारच्या १४ ते १६ बाबींवर अनुदान दिले जाते. २0११-१२ मध्ये विशेष घटक योजनेच्या विविध उपक्रमांतर्गत घेतलेल्या विहिरींवर कृषी पंप बसविणे आणि वीजजोडणी देण्याच्या उपक्रमाचा यामध्ये समावेश करण्यात आला. यासाठी मुख्यमंत्री सहायता निधी आणि जिल्हा नियोजन विकास समितीमधून निधीची तरतूद करण्यात आली. २0११-१२ आणि २0१२-१३ या वर्षात जिल्हय़ातील विशेष घटक योजनेच्या १६५१ लाभार्थींची मोफत कृषी पंप जोडणीसाठी निवड झाली होती. यामध्ये वाशिम तालुक्यातील २४८, मालेगाव १५६, रिसोड ३६६, मंगरुळपीर ३५0, मानोरा २0१ आणि कारंजा तालुक्यातील ३४२ लाभार्थींंचा समावेश आहे. यापैकी ३२ लाभार्थ्यांनी वैयक्तिक स्तरावर यापूर्वी कृषी पंप जोडणी घेतली तसेच १६ लाभार्थ्यांंनी यापूर्वी वीज जोडणीसाठी आवश्यक त्या रकमेचा भरणा केला. परिणामी, १६१९ लाभार्थ्यांंना मोफत कृषी पंप जोडणीचा लाभ देण्यासाठी शासनाने निधीची तरतूद केली. १६१९ लाभार्थ्यांंमध्ये वाशिम तालुक्यातील २0९, मालेगाव १७३, रिसोड ३५६, मंगरुळपीर ३४९, मानोरा १९९ व कारंजा तालुक्यातील ३३३ लाभार्थींंचा समावेश आहे.