वाशिम तालुक्यातील १८ गावांना बक्षिसाची प्रतीक्षा
By Admin | Updated: August 20, 2014 23:02 IST2014-08-20T23:02:00+5:302014-08-20T23:02:00+5:30
पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना

वाशिम तालुक्यातील १८ गावांना बक्षिसाची प्रतीक्षा
देपुळ : पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेमध्ये सन २0१२-१३ या आर्थिक वर्षामध्ये वाशिम पं.स. अंतर्गत पात्र ठरलेल्या १८ ग्रामपंचायतीला बक्षिसाचे रकमेपैकी केवळ ९१ हजार रुपयांची बोळवण करुन उर्वरीत बक्षिसासाठी अजूनही प्रतिक्षा आहे. तसेच पात्र ग्रामपंचायतीला १२ व्या वित्त आयोगाच्या निधीचा वाढीव हप्ता मिळत असतो. तोही मिळाला नसल्याने या योजनेच्या अमलबजावणी व जि.प. प्रशासनाच्या कार्यावर प्रश्नचिन्ह उभे राहत आहे. वाशिम पंचायत समिती विस्तार अधिकारी तथा तत्कालीन गटविकास अधिकारी निलेश मोहोड तथा ग्रामसेवक यांच्या प्रयत्नाने सन २0१२-२0१३ चा वर्षामध्ये सोनखास, जवळा, तांदळी (बु.) भोयता, वांगी, ब्राम्हणवाडा, गोंडेगाव, ईलखी, धानोरा (खुर्द), उकळीपेन, अंजनखेडा, गणेशपूर, कोंडाळा महाली, धानोरा बु., जांभरुण परांडे, देवठाणा बु., आसोला जहाँगीर, उमरा शम इत्यादी १८ ग्रामपंचायती पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेसाठी पात्र ठरली. त्यामुळे या गावाला प्रत्येकी ३ लक्ष रुपयाच्या बक्षिसाचा निधी मिळायला पाहिजे होता. परंतु चार महिन्यापूर्वी संबंधित ग्रामपंचायतीला ३ लक्ष रुपयापैकी केवळ ९१ हजार रुपयाचा निधी देण्यात आला व उर्वरीत निधीसाठी अजूनही प्रतिक्षा करावी लागत आहे ही बाब खेदजनक आहे. तसेच या योजनेत पात्र ठरलेल्या ग्रामपंचायतीला १३ व्या वित्त आयोगाचा १५ टक्के वाढीव निधी मिळत असतो तोही मिळाला नाही.