१६,१८१ विद्यार्थी देणार बारावीची परीक्षा !
By Admin | Updated: February 17, 2016 02:09 IST2016-02-17T02:09:53+5:302016-02-17T02:09:53+5:30
१८ फेब्रुवारीपासून प्रारंभ; सहा भरारी पथकांचे गठण.

१६,१८१ विद्यार्थी देणार बारावीची परीक्षा !
वाशिम : इयत्ता बारावीच्या वार्षिक परीक्षेला १८ फेब्रुवारीपासून प्रारंभ होत असून, जिल्ह्यातील १६ हजार १८१ विद्यार्थ्यांंची त्यासाठी नोंदणी झाली आहे. दरम्यान, कॉपीमुक्त अभियान यशस्वी करण्यासाठी सहा पथकांचे गठण करण्यात आले. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात येणार्या इयत्ता बारावीच्या वार्षिक परीक्षेत वाशिम जिल्ह्यात कोणताही गैरप्रकार होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासन व माध्यमिक शिक्षण विभागाने दक्षता घेतली आहे. वाशिम जिल्ह्यात नियमित १५ हजार ४९८ आणि पुनर्परीक्षार्थी ६८३ असे एकूण १६ हजार १८१ विद्यार्थी बसले आहेत. जिल्ह्यात एकूण ५५ परीक्षा केंद्रांवर परीक्षा होणार आहे. कॉपीमुक्त अभियान यशस्वी करण्यासाठी सहा भरारी पथकांचे गठण करण्यात आले आहे. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्या नेतृत्वात एक पथक राहणार आहे. याप्रमाणे शिक्षणाधिकारी (प्राथमिक), शिक्षणाधिकारी (निरंतर), उपशिक्षणाधिकारी, डाएटचे प्राचार्य आणि जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकार्यांचे स्वतंत्र भरारी पथक परीक्षेवर नियंत्रण ठेवणार आहे. परीक्षा केंद्रांवर पर्यवेक्षक व अन्य कर्मचार्याच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून, प्रशिक्षणही देण्यात आले. परीक्षेदरम्यान कॉपीचे प्रकार लक्षात घेता, यावर्षी विशेष पावले उचलली आहेत. बारावीच्या परीक्षेत जिल्ह्यातील एकही परीक्षा केंद्र उपद्रवी म्हणून घोषित झाले नाही. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शाळा-महाविद्यालयांत पालक-शिक्षक सभा घेऊन कॉपीमुक्त अभियान व बारावीच्या परीक्षेबाबत मार्गदर्शन केले. त्याचा परिणाम बारावीच्या परीक्षावर होणार आहे.