१४६१ उमेदवारांची माघार!
By Admin | Updated: July 25, 2015 01:42 IST2015-07-25T01:42:39+5:302015-07-25T01:42:39+5:30
ग्रामपंचायत निवडणूक : मोर्चेबांधणीस प्रारंभ, २३६ उमेदवार अविरोध.

१४६१ उमेदवारांची माघार!
वाशिम : जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ४ ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असल्याने गावात राजकीय वातावरण तापले आहे. या निवडणुकीत १४६१ उमेदवारांनी माघार घेतली तसेच २३६ सदस्य अविरोध झाल्याने आता १२८९ सदस्यांसाठी निवडणूक पार पडणार आहे. जिल्ह्यात होऊ घातलेल्या १६३ ग्रामपंचायतची निवडणुकीत १५२५ सदस्य मतदारांना निवडून द्यायचे होते, यामधील २३६ सदस्य अविरोध झाल्याने १२८९ सदस्य निवडीसाठी निवडणूक पार पडणार आहे. राजकीय नेत्यांनी मोर्चेबांधणीस प्रारंभ केला असून आपलेच उमेदवार निवडून यावेत, यासाठी प्रयत्न चालविले आहेत. रिसोड तालुक्यातील चिखली येथील नऊ सदस्यसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमधील आठ सदस्य अविरोध झाल्याने व एका उमेदवारासाठी निवडणूक होत असल्याने ही ग्रामपंचायत अविरोध होण्यापासून राहिली. तीच परिस्थिती पिंपळगाव व सावरगाव येथील आहे. वाशिम तालुक्यातील सात सदस्यीय भोयता व नऊ सदस्यीय सावंगा ग्रामपंचायसह तोडगाव येथील २, पिंपळगाव ७, पार्डी आसरा १, सावरगाव १0, तांदळी २, तामसी २ व तोरनाळा २ असे एकूण ४२ सदस्य अविरोध झाल्याने वाशिम तालुक्यात १८९ सदस्यांसाठी निवडणूक होणार आहे. कारंजा तालुक्यातील रामनगर ग्रामपंचायतचे ४, खेर्डा बु. २, बेंबळा १, सिरसोली २, पिंप्री मोडक २, राहटी ३, हिंगणवाडी २, मोरंबी २, गायवळ ५, शेलुवाडा ३, मेहा १ ग्रामपंचायत असे एकूण २७ सदस्याचा समावेश आहे. २४१ सदस्य संख्या असलेल्या कारंजा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीतील २७ सदस्य अविरोध झाल्याने आता २२४ सदस्यांसाठी निवडणूक होणार आहे. रिसोड तालुक्यातील ९ सदस्यीय संख्या असलेली एकलासपूर ग्रामपंचायत अविरोध झाली. तसेच ४४ सदस्य अविरोध झालेत. तालुक्यात ३३४ सदस्यांसाठी निवडणूक होणार होती परंतु ४४ सदस्य अविरोध झाल्याने २९0 सदस्यांसाठी निवडणूक होणार आहे.