नालासोपारा : नव्याने उदयाला आलेल्या मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ-३ मधील वाहतूक कोंडी, गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पोलीस उपायुक्त प्रशांत वाघुंडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
परिमंडळ-३ मध्ये वालीव, तुळींज आणि विरार या तीन पोलीस ठाण्यांचा समावेश असून यातील तुळींजच्या स्लम परिसरात गुन्हेगारी वाढली आहे. यामुळे तुळींज पोलिसांच्या डोक्याला मोठा ताण आहे. लवकरच तुळींज पोलीस ठाण्याचे आचोळे पोलीस ठाण्यात विभाजन होणार असल्याने पोलिसांवरील ताण कमी होणार आहे. धानीव, पेल्हार परिसरातही मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू असल्यानेही गुन्हेगारी फोफावली आहे. या पोलीस ठाण्यात पोलीस बळ अपुरे असतानाही जे पोलीस आहेत त्यांच्या मदतीने यावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
वाढती गुन्हेगारी आणि आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने गंभीर स्वरूपाचे गुन्हे ज्यांच्यावर दाखल आहेत, त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करण्यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू आहे. ज्यांच्यावर २ किंवा ३ पेक्षा जास्त गुन्हे आहेत, त्यांची स्थानिक पोलिसांनी यादी बनवली आहे. तडिपार करण्यासाठी पहिले प्रांताकडे अधिकार होते, पण आयुक्तालय झाल्याने डीसीपी किंवा एसीपी निर्णय घेऊ शकत किंवा त्यांच्याकडे अधिकार आले असल्याने आरोपीला तडिपार करण्यासाठी वाट बघण्याची गरज नाही. रेकॉर्डवरील तडिपार आरोपींचीही यादी तयार आहे.
लवकरच वाहतूक पोलिसांची भरती
परिमंडळ-३ च्या हद्दीत मनपाकडून कोणत्या ठिकाणी पार्किंगसाठी जागा आहेत, त्यांची माहिती मागवली आहे. जागा उपलब्ध करून देण्यासाठी आयुक्तांना पत्रव्यवहार केला आहे. तसेच वाहतूक पोलिसांची संख्या अपुरी असल्याने त्यांच्यासोबत १०० वाॅर्डन त्यांना देण्यात येणार आहे. लवकरच वाहतूक पोलिसांची भरती करण्यात येणार आहे.