वाहने चोरणारी सराईत टोळी गजाआड
By Admin | Updated: May 3, 2015 05:41 IST2015-05-03T05:41:10+5:302015-05-03T05:41:11+5:30
राज्यातील विविध शहरांमधून वाहने चोरणाऱ्या एका सराईत टोळीला नुकताच गुन्हे शाखेच्या वाहन चोरी विरोधी पथकाने अटक केली

वाहने चोरणारी सराईत टोळी गजाआड
मुंबई : राज्यातील विविध शहरांमधून वाहने चोरणाऱ्या एका सराईत टोळीला नुकताच गुन्हे शाखेच्या वाहन चोरी विरोधी पथकाने अटक केली. या आरोपींकडून पोलिसांनी तब्बल १ कोटी ६५ लाख किमतीची २१ चोरलेली वाहने हस्तगत केली आहेत.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध शहारांमधून कार आणि ट्रक चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. याबाबत मुंबईसह राज्यातील अनेक पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र ही टोळी पोलिसांच्या हाती लागत नव्हती. या टोळीला अटक करण्यासाठी गुन्हे शाखेच्या वाहन चोरी विरोधी पथकानेदेखील तपास सुरू केला होता.
वाहन चोरी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश साईल यांना या टोळीबाबत काही दिवसांपूर्वी माहिती मिळाली. त्यानुसार एपीआय जयद्रथ तांबे, आनंद मुदलीयार आणि पोलीस शिपाई माईनकट्टे, सोनकांबळे या पथकाने औरंगाबाद, कोल्हापूर आणि बेळगाव या ठिकाणी छापे घालत सलीम सय्यद (२५), अजहर शेख (२६), मैनुद्दीन पठाण (४०), इरफान खान (३०) आणि गुलफाम खान (२२) या पाच जणाना अटक केली.
चौकशीत या आरोपींनी मुंबईसह कोल्हापूर, पुणे, औरंगाबाद आणि गुजरात येथून १७ कार आणि २ ट्रक चोरल्याची कबुली दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी ही सर्व वाहने हस्तगत केली आहेत. यामध्ये आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता असून त्यानुसार पोलीस याची अधिक चौकशी करत आहेत. (प्रतिनिधी)