वनरक्षकांवर हल्ला करणाऱ्या तीन तस्करांना अटक
By Admin | Updated: September 26, 2016 17:36 IST2016-09-26T17:36:48+5:302016-09-26T17:36:48+5:30
वनरक्षकांवर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी करून फरार झालेल्या टोळीतील तीन तस्करांना विरार पोलिसांनी अटक केली

वनरक्षकांवर हल्ला करणाऱ्या तीन तस्करांना अटक
ऑनलाइन लोकमत
वसई, दि. 26 - विरारजवळील जंगलात जून महिन्यात वनरक्षकांवर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी करून फरार झालेल्या टोळीतील तीन तस्करांना विरार पोलिसांनी अटक केली आहे. सीसीटीव्हीत दिसलेल्या टेम्पोच्या वर्णनावरून पोलिसांनी ही कारवाई केली. याआधी पोलिसांनी दोघांना अटक केली होती. अद्याप 6 जण फरार आहेत.
दहा जूनच्या पहाटे साडेचारच्या सुमारास हि घटना होती. तस्करांची टोळी जंगलात वृक्षतोडीसाठी आणि शिकारीसाठी येणार असल्याची माहिती वसई वनविभागाला मिळाली होती. तीन वनवरक्षकांचे एक पथक त्यांना शोधण्यासाठी जंगलात निघाले होते. पहाटे साडेचारच्या सुमारास पाचरूखे जंगलात गस्त घालत असताना तस्करांच्या टोळींनी या पथकावर दगडांनी तुफान हल्ला चढविला. तस्करांनी वनरक्षकांना कोंडीत पकडून दगडांनी हल्ला चढवला. दहा ते बारा जणांचे तस्कर एका टेम्पोतून आले होते. हल्ले खोर त्यांनतर फरार झाले होते.
या हल्ल्यात वन रक्षक एन.बी. दळवी गंभीर जखमी झाले होते. त्यांच्या डोक्याला 34 टाके पडून हात फ्रॅक्चर झाला होता. या हल्ल्यात इतर कर्मचार्यांनी आपला जीव कसाबसा वाचविला होता.
विरार पोलिसांकडे तस्कर टेम्पोतून पळून जात असताना टोल नाक्यावरील सीसीटीव्ही फुटेज सापडले होते. त्या आधारे त्यांचा शोध सुरू होता. तस्करांची टोळी महामार्गावर येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून हा टेम्पो ताब्यात घेऊन बाळकृष्ण भावर , आसिब मुल्ला व लक्ष्मण गुलुम या तिघांना अटक केली. या टोळीतील दोन तस्करांना यापुर्वीच अटक करण्यात आली आहे.
सीसीटीव्हीत टेम्पो दिसला असेल म्हणून या तस्करांनी टेम्पोची नंबर प्लेट बदलली होती तसेच टेम्पोचा रंग बदलला होता अशी माहिती विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक युनूस शेख यांनी दिली.