सूर्या धरण, परिसराची सुरक्षितता धोक्यात

By Admin | Updated: February 1, 2017 02:57 IST2017-02-01T02:57:54+5:302017-02-01T02:57:54+5:30

पालघर जिल्हयातील पालघर, डहाणू, विक्रमगड, वसई तालुक्यातील गावांची तहान भागविणाऱ्या सूर्या धरणाची सुरक्षितता ५ कोटी ६५ लाखांचे वीज बिल थकल्याने धोक्यात आली आहे.

Surya Dam, the security of the premises threatens | सूर्या धरण, परिसराची सुरक्षितता धोक्यात

सूर्या धरण, परिसराची सुरक्षितता धोक्यात

- शशिकांत ठाकूर, कासा
पालघर जिल्हयातील पालघर, डहाणू, विक्रमगड, वसई तालुक्यातील गावांची तहान भागविणाऱ्या सूर्या धरणाची सुरक्षितता ५ कोटी ६५ लाखांचे वीज बिल थकल्याने धोक्यात आली आहे. १० दिवसापासून वीजपुरवठा खंडीत केल्याने धरणावर अंधार आहे.
सूर्या प्रकल्पाचे सन २०१३ पासूनच्या ४ वर्षाचे ५ कोटी ६२ लाख विजबिल थकीत आहे. यामध्ये २ कोटी ४० लाख निव्वळ वीजबिल आहे. तर त्या वरील विलंब आकार ३ कोटी २२ लाख एवढा आहे. यामध्ये जानेवारी २००२ पासूनच्या वीज बिलावरील ही विलंब आकारही आहे. महावितरणकडून २१ जानेवारी रोजी वीज कनेक्शन खंडीत केले आहे. त्यामुळै सूर्या प्रकल्पातील सूर्या धरण, धामणी कवडास धरण व सूर्या वसाहतीत अंधार आहे. सूर्या कर्मचारी वसाहतीचा पाणीपुरवठा विजेअभावी बंद पडला आहे. दरम्यान वीज नसल्याने सूर्या धरणावर अंधार आहे. त्यामुळे धरणावरील कर्मचारी व सुरक्षा रक्षकांना अंधारात रहावे लागते. सुरक्षिततेच्या दृष्टीने धरणावर उभारण्यात आलेले ३० पथदिवे धरणाच्या दोनही बाजूने व प्रवेशव्दार व पायथ्याशी उभारण्यात आलेले ६ टॉवर लाईट बंद आहेत.
सूर्या प्रकल्पातून उन्हाळयात सुमारे १०० गावातील शेतीला पाणीपुरवठा केला जातो. त्याच प्रमाणे वसई, विरार महानगरपालिका, पालघर व डहाणू नगरपरिषद, बोईसर औद्योगिक क्षेत्र (एमआयडीसी) तारापूर उर्जा प्रकल्प, डहाणू थर्मल पॉवर, टॅम्स कॉलनी आदी ठिकाणी पाणीपुरवठा केला जातो. या पाणीपट्टीतून शासनास वर्षाकाठी सुमारे २० कोटी महसूल मिळतो. मात्र तरीही वेळोवेळी वीजबिल भरले जात नाही. विशेष बाब म्हणजे धरणाच्या पायथ्याशी महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीचे जलविद्युत केंद्र आहे. तेथे ६ मॅगावॅट वीज निर्मिती केली जाते. मात्र वितरण कंपनी वेगळी असल्याने वीजनिर्मिती होत असतांनाही तेथे वीज दिली जात नाही. धरण परिसरात जंगल असल्याने मोठया प्रमाणात विषारी साप आढळतात त्यामुळे रात्री अपरात्री कर्मचाऱ्यांना भीतीदायक वातावरणात राहावे लागते. तसेच वीज नसल्याने काही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाने सदर बाब गांभिर्याने घेणे गरजेचे आहे. येथे एखादी दुर्घटना घडल्यानंतरच जलसंपदाखात्याला जाग येणार आहे काय? (वार्ताहर)

१७ नोव्हेंबर पासून शासनाच्या नवीन परिपत्रकानुसार सूर्या प्रकल्पाची पाणीपट्टी कोकण पाटबंधारे विकास महामंडळाकडे जमा केली जात असून तेथून लवकरच वीजबिल भरले जाईल.
-निलेश दुसाने, कार्यकारी अभियंता सूर्या प्रकल्प

Web Title: Surya Dam, the security of the premises threatens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.