सर आली धावून, सेंट्रिंग गेले वाहून; वाडा-भिवंडीला जोडणाऱ्या उचाट पुलाचा अर्धवट स्लॅब कोसळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 01:12 IST2019-06-30T01:12:20+5:302019-06-30T01:12:43+5:30

गेल्या एप्रिल महिन्यात पुलाच्या स्लॅबसाठी सेट्रींग ठोकण्यात आले होते.

The semi-slab collapsed with a bridge connecting the Wada-Bhiwandi | सर आली धावून, सेंट्रिंग गेले वाहून; वाडा-भिवंडीला जोडणाऱ्या उचाट पुलाचा अर्धवट स्लॅब कोसळला

सर आली धावून, सेंट्रिंग गेले वाहून; वाडा-भिवंडीला जोडणाऱ्या उचाट पुलाचा अर्धवट स्लॅब कोसळला

वाडा : वाडा व भिवंडी तालुक्यांना जोडणारा उचाट येथील तानसा नदीवरील पुलाचे काम अतिशय संथगतीने सुरू असून मुदत संपून एक वर्षाहून अधिक काळावधी उलटला असतनाही पुलाचे काम अद्याप पूर्ण न झाल्याने नागरिकांची गैरसोय सुरूच आहे. गेल्या एप्रिल महिन्यात पुलाच्या स्लॅबसाठी सेट्रींग ठोकण्यात आले होते. मात्र, उन्हाळ्यात स्लॅब न भरल्याने व शुक्रवारी झालेल्या पावसात नदीला पुर आल्याने सेट्रींग चे साहित्य वाहून गेल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
वाडा व भिवंडी तालुक्यांना जोडणारा उचाट येथील तानसा नदीवरील पुलाच्या कामाला ५ एप्रिल २०१६ मध्ये मंजूरी देण्यात आली. पुल अधिक ५०० मीटर रस्ता अशा दोन्ही कामांसाठी ४ कोटी ४० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला होता. पुलाच्या कामाचा ठेका नाशिक येथील आर. के. सावंत या ठेकेदाराला देण्यात आला आहे. उभारणीसाठी दोन वर्षाचा कालावधी देण्यात आला होता.
ठेकेदाराने २०१६ मधील एप्रिल महिन्यात पुलाच्या कामाला सुरवात केली मात्र, नियोजित कालावधी होऊन वर्षाहून अधिक काळ उलटला तरी अद्यापही या पुलाचे ४० टक्के काम शिल्लक आहे. एप्रिल २०१९ साली पुलाचा स्लॅब टाकण्यासाठी सेट्रींगचे काम करण्यात आले होते. मात्र, स्लॅब न टाकल्याने शुक्रवारी झालेल्या पावसात नदीला पुर आल्याने सेट्रींग चे साहित्य वाहून गेले आहे. त्यातच पुलाजवळ तयार करण्यात आलेल्या रस्त्यावरही मुरूम ऐवजी माती टाकल्याने संपूर्ण रस्ता चिखलमय झाला आहे. या कामात दिरंगाई करणाºया ठेकेदाराला प्रति दिन एक हजार रु पये प्रमाणे दंड आकारला जातो मात्र, दंड आकारूनही ठेकेदार याकामाकडे गांभीर्याने बघत नसल्याचे दिसून येत आहे.
वाडा तालुक्यातील उचाट येथे पहिली ते बारावीपर्यंत शाळा असून या शाळेत भिवंडी तालुक्यातील म्हणजेच तानसा नदीपलीकडच्या २० ते २५ गावातील सुमारे ८०० विद्यार्थी उचाट येथे शिक्षणासाठी येत असतात. नियोजित पुलाच्या वरच्या बाजूला एक छोटा बंधारा असून या बंधाºयावरून पावसाळ्यात विद्यार्थी येत असतात. मात्र पुराच्या वेळेस या बंधाºयावरून पाणी जात असते. अशा वेळी त्यांचे शैक्षणकि नुकसान होते. तसेच, काही वर्षापूर्वी या बंधाºयाला संरक्षक कठडा नव्हता त्यामुळे येथे विद्यार्थी पुराच्या पाण्यात वाहून गेल्याच्या एक दोन घटनाही येथे घडल्या आहेत.

संबंधित ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाकडे आम्ही हेलपाटे मारून कंटाळलो मात्र, त्यांना पुलाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. पुलाचे काम अतिशय कासवगतीने सुरू असल्याने ते पूर्ण होता होईना. आता आम्हाला आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय नाही.
- प्रभाकर मोरे,
ज्येष्ठ ग्रामस्थ उचाट

शासनाने ठरवून दिलेल्या वेळेत पुलाचे काम पूर्ण करू न शकलेल्या ठेकेदारावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी आमची मागणी आहे.
- प्रा.रमेश मोहिते, शिक्षक,
उचाट शिक्षण संस्था उचाट

पुलाच्या कामात दिरंगाई केल्याने संबंधित ठेकेदाराला प्रति दिन एक हजाराचा दंड आकारला जात आहे.
- प्रकाश पातकर,
शाखा अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, वाडा

Web Title: The semi-slab collapsed with a bridge connecting the Wada-Bhiwandi