मंगळवारी रिक्षाचालकांचा आरटीओवर मूक मोर्चा
By Admin | Updated: January 30, 2017 01:29 IST2017-01-30T01:29:13+5:302017-01-30T01:29:13+5:30
केंद्रीय मोटर वाहन नियम १९८९ च्या नियमातील शुल्कात केलेल्या भरमसाठ वाढीविरोधात वसईतील रिक्षा संघटना विरार येथील उपप्रादेशिक कार्यालयावर मंगळवारी मूक मोर्चा नेणार आहेत.

मंगळवारी रिक्षाचालकांचा आरटीओवर मूक मोर्चा
वसई : केंद्रीय मोटर वाहन नियम १९८९ च्या नियमातील शुल्कात केलेल्या भरमसाठ वाढीविरोधात वसईतील रिक्षा संघटना विरार येथील उपप्रादेशिक कार्यालयावर मंगळवारी मूक मोर्चा नेणार आहेत.
केंद्र सरकारच्या भूपृष्ठ व दळणवळण मंत्रालयाने केंद्रीय मोटर वाहन नियम १९८९ च्या नियमातील शुल्कात भरमसाठ वाढ केली आहे. यासंदर्भात या मंत्रालयाने २९/१२/२०१६ रोजी अधिसूचना काढून त्याची पूर्वलक्षी अंमलबजावणी करण्याचे आदेश काढले आहेत. केंद्र सरकारने अनुज्ञप्ती, व्यवसाय प्रमाणपत्र, वाहन नोंदणी, बोजा चढविणे या विविध विषयांच्या कामकाज शुल्कात १० ते १५ पटीने वाढ केली आहे. या भरमसाठी शुल्क वाढीमुळे रिक्षा, टॅक्सी, बस, खाजगी वाहने, अपंगांची वाहने यांना मोठा फटका बसणार आहे. या भरमसाठ शुल्क वाढीच्या विरोधात देशासह महाराष्ट्रात वाहतूक संघटनांमध्ये असंतोष खदखदत आहे.
केंद्राची ही अधिसूचना तत्काळ रद्द करावी यासाठी ३१ जानेवारीला महाराष्ट्रभर आॅटो रिक्षा चालक-मालक संघटना राज्य कृती समितीतर्फे चक्का जाम करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर वसई तालुक्यातील सर्व संघटना मिळून ३१ जानेवारीला उपप्रादेशिक कार्यालयावर मूक मोर्चा नेऊन शुल्क वाढीचा निषेध करून ही अधिसूचना रद्द करण्याची मागणी करणार आहे.
आज वसई पश्चिम विश्वकर्मा हॉल येथे तालुक्यातील रिक्षा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात मोर्चा नेण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थान शिवराज मुमाणे होते. विजय खेतले, जयकर तिवारी, मधुसूदन राणे, दयाशंकर गोंड, बाबूलाल राजभर, स्वप्निल नर, अरविंद पाटील, रघुनाथ कळभाटे, महेश कदम, रफिक शेख, रिझवान शेख, गोपाळ कांदळगांवकर, बब्बू मिश्रा, नरेंद्र कौर, नसीम खान, हरिश यादव, अशोक मिश्रा, सुधाकर इंगळे आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.