वर्सोवा पुलाची दुरुस्ती पुन्हा रखडली
By Admin | Updated: February 1, 2017 02:52 IST2017-02-01T02:52:52+5:302017-02-01T02:52:52+5:30
वर्सोवा पूलाला तडे गेल्याने गेल्या सप्टेंबर महिन्यापासून अवजड वाहनांसाठी बंद ठेवण्यात आलेल्या या पुलाच्या दुरुस्तीच्या अहवालावरील अभिप्राय आयआयटीकडून अद्याप

वर्सोवा पुलाची दुरुस्ती पुन्हा रखडली
- शशी करपे, वसई
वर्सोवा पूलाला तडे गेल्याने गेल्या सप्टेंबर महिन्यापासून अवजड वाहनांसाठी बंद ठेवण्यात आलेल्या या पुलाच्या दुरुस्तीच्या अहवालावरील अभिप्राय आयआयटीकडून अद्याप आलेला नाही. त्यामुळे पूल दुरुस्तीचे काम रेंगाळून पडले आहे. दुरुस्तीसाठी किती कालावधी लागेल याची ठोस माहिती संंंबंधित खाते देऊ शकत नसल्याने वाहतूक कोंडीचा जाच पुढील काही महिने सहन करावा लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वसई खाडीवरच्या जुन्या वर्सोवा पुलाच्या दुरुस्तीचे काम अद्याप सुरु न होऊ शकल्याने हजारो वाहन चालकांना वाहतूक कोंडीचा त्रास होत आहे. त्याची दखल घेत ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी संंबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. चार महिने होऊन गेले तरी काहीही काम झालेले नाही. दुरुस्तीच्या कामाला एवढा विलंब का लागला. त्याचप्रमाणे यापुढील दुरुस्तीचे निश्चित वेळापत्रक काय ते तातडीने सादर करण्याचे निर्देश ठाणे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी सोमवारी एका बैठकीत दिले.
या पुलाचे काम पूर्ण करण्याबाबत राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात गेल्या सप्टेंबर महिन्यात झालेल्या बैठकीत सांगितले होते. त्यादृष्टीने वाहतूक ही नियंत्रित करण्यात आली होती. राम्बोल इंडिया लिमिटेड या सल्लागार कंपनीने दुरुस्तीसंदर्भात आपला अहवाल चार पाच दिवसांपूर्वीच आयआयटीला दिला असून अद्याप आयआयटीने त्यावरील आपला अभिप्राय दिलेला नाही. तो मिळताच दुरुस्तीबाबत पुढील कार्यवाही सुरु होईल. लहान लहान तडे बुजवण्याचे काम झाले असून मोठे काम शिल्लक आहे. मात्र हा पूल वाहतुकीस सुरु होण्यासाठी प्रदीर्घ कालावधी लागू शकतो अशी माहिती आयआरबीच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत दिली.
जून्या वर्सोवा पूलाला तडे गेल्याने गेल्या चार महिन्यांपासून दुरुस्तीच्या नावाखाली पुलावरील अवजड वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. सध्या या पूलावरून हलक्या वाहनांना वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे याठिकाणी तासन तास वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. यासंदर्भात त्वरित सध्याची वाहतूक परिस्थिती आणि दुरुस्तीच्या कामाला लागत असलेला विलंब राष्ट्रीय महामार्गच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कानी घालावा. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सचिवांना देखील यासंदर्भात अवगत करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी निवासी उपजिल्हाधिकारी वंदना सूर्यवंशी यांना दिले.
पूल दुरुस्तीच्या कामामुळे पोलिसांवर ताण येत असून तातडीने पर्यायी ठोस व्यवस्था झाली पाहिजे, असे ठाणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक डॉ. महेश पाटील यांनी सांगितले. प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी देखील वाहतूक नियंत्रण करण्यातील अडचणी सांगितल्या तसेच याबाबत राष्ट्रीय महामार्गाकडून त्वरित पर्यायी व्यवस्था व्हावी अशी मागणी केली. या बैठकीस अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रवीण शिंदे, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी एस.जी.काटदरे, आयआरबीचे उपाध्यक्ष (डिझाईन) जयंत भिडे उपस्थित होते.
महाडमधील दुर्घटनेनंतर मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग आठच्या वसई खाडीवरील वरसावेचा जुना पूल अवजड वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे. या महामार्गावर वरसावे येथे दोन पूल आहेत. जुना पूल १९७०च्या आसपास बांधण्यात आला आहे. तो १९७३ मध्ये वाहतुकीसाठी खुला झाला. त्याच्या एका गर्डरला डिसेंबर २०१३ मध्ये तडे गेल्यानंतर दुरुस्तीसाठी तो चार महिने बंद ठेवण्यात आला होता. पुन्हा एका गर्डरला तडा गेल्याने आॅगस्टपासून हा पूल अवजड वाहनासाठी बंद ठेवण्यात आला आहे.
सध्या अवजड वाहनांची वाहतूक चिंंचोटी आणि पालघर-वाडा-भिवंडी मार्गे वळवण्यात आलेली आहे. मात्र, जुना पूल हलक्या वाहनांसाठी मोकळा असल्याने दोन्ही बाजूची वाहतूक वीस-वीस मिनिटे बंद ठेवण्यात येते. त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी होऊन वाहनचालकांना तासनतास अडकून पडावे लागत आहे.