पावसामुळे दुग्ध व्यवसायावर परिणाम, मुंबईतील तबेल्यांनाही बसणार झळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2019 11:02 PM2019-11-05T23:02:03+5:302019-11-05T23:02:42+5:30

भाताची पावळी भिजल्याने गवत व्यापारी संकटात : मुंबईतील तबेल्यांनाही बसणार झळ

Rainfall affects dairy business, stables in Mumbai | पावसामुळे दुग्ध व्यवसायावर परिणाम, मुंबईतील तबेल्यांनाही बसणार झळ

पावसामुळे दुग्ध व्यवसायावर परिणाम, मुंबईतील तबेल्यांनाही बसणार झळ

Next

अनिरुद्ध पाटील

डहाणू/बोर्डी : परतीच्या पावसामुळे भात शेतीचे नुकसान झाले असून शेती आणि शेतीपूरक व्यवसायावरही त्याचे परिणाम जाणवू लागले आहेत. दरम्यान, भाताची पावळी भिजल्याने डहाणूच्या चिकू वाडीतील दुग्ध व्यवसाय आणि मुंबईतील तबेल्यांनाही त्याचा फटका बसणार आहे.

डहाणू तालुक्यात सुमारे १५ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीपातील भात पीक घेतले जाते. गेल्या आठवड्यात परतीचा पाऊस झाल्यानंतर हळवे, गरवे आणि निमगरवे या तिन्ही प्रकारच्या पिकाला मोठा फटका बसला आहे. ज्याप्रमाणे भाताच्या दाण्यांचे नुकसान झाले तसाच फटका पावळीलाही बसला आहे. भिजलेल्या पावळीला बुरशीचा प्रादुर्भाव होऊन ते काळपट पडून दीर्घकाळ साठवण्यास अयोग्य ठरतात. त्यामुळे पावळी शेतकरी आणि गवत व्यापाऱ्यांना योग्य दर मिळणार नाही. शिवाय त्याचा थेट प्रभाव दुग्ध व्यवसायावरही होणार आहे. ही ओली पावळी खाण्यास गाई -म्हशी नापसंती दाखवत असल्याने दुधाचे प्रमाण घटते. त्यांच्यात पचनक्रि येसंदर्भातील पोटाचे विकार बळावतात. काही दिवसांपासून ओली पावळी खाल्ल्याने शेण पातळ झाले असून दुधातही घट जाणवत असल्याची माहिती स्थानिक दुग्ध व्यावसायिकांनी दिली.
डहाणू तालुक्यात सुमारे पाच हजार हेक्टरवर चिकू फळ बागांचे क्षेत्र आहे. मुबलक पाणी, पावळीच्या माध्यमातून मिळणारा सुका चारा तसेच बागायतीसह भाजीपाला लागवडीमुळे दुग्ध व्यवसायासाठी आवश्यक ओला चारा उपलब्ध होतो. त्यामुळे गुजरात राज्यातील दुग्ध व्यावसायिक चिकू वाडीत येऊन हा व्यवसाय करतात. त्या बदल्यात बागायतदारांना शेण दिले जाते. जनावरांसाठी गोठा, पाणी, वीज आदी सुविधा उपलब्ध केल्याच्या बदल्यात शेणविक्रीद्वारे त्यांना चांगला फायदा मिळतो. शिवाय बागायतीला खताचा मुबलक पुरवठा होतो. त्यामुळे काही दशकांपासून चिकू वाडीतील दुग्ध व्यवसाय भरभराटीला आला आहे.
दरम्यान, डहाणू आणि तलासरी तालुक्यात भात शेती कसण्याला सामाजिक प्रतिष्ठेतून पाहिले जाते. त्यामुळे अल्प, अत्यल्प भूधारक, बागायतदार किंवा नोकरी, व्यवसाय करणारे सर्वच समाजघटक भात शेती करतात. त्याद्वारे मोठ्या प्रमाणात पावळी आणि गवताचा व्यवसाय केला जातो. या पेंढ्यांना मशीनद्वारे प्रेस करून त्यांचे बंडल बांधून निर्यात केले जाते. वसई, ठाणे, मुंबई येथील तबेल्यांची सुक्या चाºयाची भिस्त डहाणूसह जिल्ह्यातील विविध तालुक्यातील गवत व्यापारावर अवलंबून आहे. अवकाळी पावसाने शेतीचे नुकसान झाल्याने यंदा मात्र दुग्ध व्यवसायावरही त्याचा परिणाम होईल.

स्थानिकांना रोजगार
च्दुभत्या जनावरांना ओला आणि सुका चारा आवश्यक असतो. फक्त ओला चारा खाल्यास त्यांचे पाणी पिण्याचे प्रमाण कमी होऊन दुधात घट होते. एक म्हैस प्रतिदिन ५ किलो सुका चारा म्हणून पावळी खाते. क्षमतेनुसार १२ ते १८ ली. दूध देते. चिकू वाडीत ओला आणि सुका चारा वर्षभर मुबलक मिळतो. याकरिता गुजरात
राज्यातील दुग्ध व्यावसायिक याला प्राधान्य देतात.
च्गुजरात, ठाणे, मुंबई येथे गवत निर्यातीद्वारे शेतकऱ्यांना पावळीला प्रती किलो किमान ३ रु. भाव मिळतो. एप्रिल ते मे या काळात गतवर्षी तो १५ रुपये झाला होता. भात पिकाचा एकूण उत्पादन खर्च कमी करण्यात त्याचा महत्त्वाचा वाटा आहे तर शेतीसह गवत व्यवसाय केल्याने ती परवडणारी ठरते. तसेच स्थानिक आदिवासींना रोजगार उपलब्ध होतो.

परतीच्या पावसाने ओली झालेली पावळी दुभती जनावरे कमी प्रमाणात खातात. त्यामुळे दुधात घट झाली. त्यांच्या पचनप्रक्रि येत बिघाड होऊन शेण पातळ झाले. माझ्याकडे १४ म्हशी आणि ३ गाई आहेत. त्यांच्यापासून प्रतिदिन सरासरी १२० लीटर दूध मिळते. ओली पावळी खाल्याने रोज चार लिटर दूध कमी झाले असून त्याची आर्थिक झळ व्यवसायाला बसत आहे.
- अमृत रबारी, गुजरातहून येऊन, बोर्डीतील चिकू वाडीत दुग्ध व्यवसाय करणारा

Web Title: Rainfall affects dairy business, stables in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.