वसईत जनआंदोलनाचा नवा राजकीय पक्ष, मोर्चेबांधणी सुरू
By Admin | Updated: February 5, 2017 02:23 IST2017-02-05T02:23:22+5:302017-02-05T02:23:22+5:30
वसई विरार महापालिका स्थापनेनंतर वसईत राजकीय धु्रवीकरण करणाऱ्या जनआंदोलन समितीने आगामी महापालिका आणि विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन नव्या

वसईत जनआंदोलनाचा नवा राजकीय पक्ष, मोर्चेबांधणी सुरू
- शशी करपे, वसई
वसई विरार महापालिका स्थापनेनंतर वसईत राजकीय धु्रवीकरण करणाऱ्या जनआंदोलन समितीने आगामी महापालिका आणि विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन नव्या राजकीय पक्षाची स्थापना करण्यासाठी मोर्चेबांधणी सुुरु केली आहे. त्यासाठी रविवारी पहिली बैठक बोलावण्यात आली असून त्यात विवेक पंडित मार्गदर्शन करणार आहेत.
२००९ साली वसई विरार महापालिकेची निर्मिती झाल्यानंतर जनआंदोलन समितीने वसईतील राजकीय क्षेत्रात मोठे आव्हान उभे केले होते. जनआंदोलन समितीने विवेक पंडितांना आमदारकी मिळवून दिली होती. तर महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीत तब्बल २१ नगरसेवक निवडून आले होते. त्यानंतर पंचायत समितीची सत्ता मिळवून तत्कालीन ठाणे जिल्हा परिषदेच्या सत्तेतही सामील होण्याचे काम जनआंदोलन समितीने केले होते.
वसईच्या राजकीय क्षेत्रात पाय रोवून उभ्या असलेल्या हितेंद्र ठाकूरांना जनआंदोलनाने मोठा हादरा दिला होता. विवेक पंडितांनी एकीकडे शिवसेनेशी घरोबा करीत लोकहितवादी लिडर पार्टीची स्थापना केली होती. आपले कट्टर समर्थक फ्रान्सिस लोपीस यांना अध्यक्ष करून पंडितांनी लोकहितवादी लिडर पार्टीच्या बॅनरखाली वसईत आपले वेगळे राजकीय अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर जनआंदोलनात असलेल्या विविध पक्षातील नेत्यांनी पंडितांची साथ सोडून मूळ पक्षात स्थिरावणे पसंत केले होते. त्यामुळे जनआंदोलनाची ताकद दिवसागणिक कमकुवत होत गेली होती. याचे परिणाम दुसऱ्यांदा झालेल्या महापालिका आणि विधानसभा निवडणुकीत पहावयास मिळाले होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत विवेक पंडित यांचा पराभव झाला.
त्यानंतर पंडितांनी वसईतील राजकारणापासून अलिप्त राहणे पसंत केले. त्यामुळे महापालिका निवडणुकीत पंडित समर्थकांची वाताहात झाली होती. परिणामी जनआंदोलन समितीची ताकद अगदी नगण्य झाली. दुसरीकडे, पंडितांनी स्थापन केलेल्या लोकहितवादी लिडर पार्टीची मान्यता निवडणूक आयोगाने रद्द केली होती. त्यामुळे वसईतील राजकारणात भूकंप करणाऱ्या पंडित आणि जनआंदोलन समितीची अवघ्या पाच वर्षात वसईतील राजकारणात मोठी पिछेहाट झाली.
एसटी बचाव आंदोलनात मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर सध्या जनआंदोलनाची धुरा खांद्यावर घेतलेल्या डॉमणिका डाबरे, मिलिंंद खानोलकर, प्रा. विन्सेंट परेरा, प्रफुल्ल ठाकूर, सुनिल डिसिल्वा या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी वसईत राजकीय पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी रविवारी वसईत जनआंदोलनात सक्रीय असलेल्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक बोलावण्यात आली आहे.