कुपोषणग्रस्त तालुके राहीले उपाशी, जव्हार, मोखाड्यावर अन्याय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2019 00:05 IST2019-05-11T00:05:04+5:302019-05-11T00:05:28+5:30

शासनाने दुष्काळग्रस्त यादीमध्ये मोखाडा, जव्हारचा अंतर्गाव केला असला तरी पोषण आहार योजनेतुन त्याना वगळल्याने येथील कुपोषणाची समस्या वाढणार आहे.

 Malnutrition-affected Talukas Raheeli hunger strike, injustice on Jawhar, Mokhada | कुपोषणग्रस्त तालुके राहीले उपाशी, जव्हार, मोखाड्यावर अन्याय

कुपोषणग्रस्त तालुके राहीले उपाशी, जव्हार, मोखाड्यावर अन्याय

- हुसेन मेमन
जव्हार - शासनाने दुष्काळग्रस्त यादीमध्ये मोखाडा, जव्हारचा अंतर्गाव केला असला तरी पोषण आहार योजनेतुन त्याना वगळल्याने येथील कुपोषणाची समस्या वाढणार आहे. विषेश म्हणजे राज्यात बहुतांश जिल्ह्यात दुष्काळाची स्थिती आहे. पालघर जिल्ह्यातील मोखाडा, जव्हार , पालघर, विक्र मगड, तलासरी आणि वसई तालुक्यातील ३५ गावे शासनाने दुष्काळग्रस्त जाहीर केले आहेत.
शालेय सुट्टीच्या काळातही दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील पालघर, विक्र मगड आणि तलासरी या तीन तालुक्यांमध्ये शालेय पोषण आहार राबविण्याचे आदेश पालघर जिल्हा परिषदेतील शिक्षणाधिकारी यांनी दिले आहेत. परंतु, अतिदुर्गम, कुपोषणाच्या विळख्यात अडकलेल्या आणि दुष्काळग्रस्त जाहीर केलेल्या जव्हार, मोखाडा या दोन्ही तालुक्यांना त्यातुन वगळण्यात आले आहे.
दुष्काळाचा मुकाबला करण्यासाठी शासन विविध उपाययोजना करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणजे, दुष्काळग्रस्त भागातील कुटुबांना दिलासा मिळावा म्हणून शासनाने जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय सट्ट्यांमध्ये, शालेय पोषण आहार ( मध्यान्ह भोजण ) देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्याचा फायदा दुष्काळग्रस्त भागांना होणार आहे. पालघर जिल्ह्यात पालघर, विक्र मगड, तलासरी, जव्हार, मोखाडा आणि वसई तालुक्यातील ३५ दुष्काळग्रस्त जाहीर केले आहेत. मात्र, शालेय सुट्टीमध्ये शालेय पोषण योजना राबविण्यासाठी जिल्ह्यातील पालघर, विक्र मगड आणि तलासरी या तालुक्यांनाच आदेश , जिल्हा शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांनी दिले आहेत. त्यामुळे जव्हार, मोखाडा या अतिदुर्गम आणि कुपोषणाच्या विळख्यात अडकलेल्या तालुक्यांना शासनाने दुर्लक्षित ठेवुन अन्याय केल्याचा आरोप आदिवासीं पालकांनी केला आहे. दरवर्षी या भागामध्ये कुपोषणाची समस्या डोके वर काढीत असल्याने जव्हार व मोखाड्यावर हा अन्याय मानला जात आहे.

आदिवासींच्या जखमेवर चोळले मीठ

जव्हार तालुक्यात वीस हजारांहून अधिक विद्यार्थी शालेय पोषण आहार ( मध्यान्ह भोजण ) योजनेचे लाभार्थी आहेत. मुळातच हे दोन्ही तालुके दुष्काळाच्या दाहकतेत होरपळून निघत आहेत. पाणी टंचाई आणि स्थानिक ठिकाणी रोजगाराच्या अभाव, यामुळे येथे मोठे स्थलांतर होत आहे. त्यामुळे येथे सुट्टीच्या काळात शालेय पोषण आहार योजना राबविणे आवश्यक असतांना, शासनाने दुष्काळग्रस्त तालुके जाहीर करून, आदिवासींच्या जखमेवर मीठ चोळले आहे. त्यामुळे तालुक्यातील आदिवासी संतप्त झाले आहेत.

शासनाकडून जिल्ह्यातील पालघर, विक्र मगड आणि तलासरी या तालुक्यांना सुट्टीच्या काळात शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार त्यांना आदेश देण्यात आले आहेत. तर जव्हार आणि मोखाडा या दोन्ही तालुक्यांची नावे शासनाकडून कळविण्यात आलेली नाहीत.
- राजेश कंकाळ,
जिल्हा शिक्षणाधिकारी,
पालघर जिल्हा परिषद

Web Title:  Malnutrition-affected Talukas Raheeli hunger strike, injustice on Jawhar, Mokhada