रस्ताच खचल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 00:57 IST2019-08-11T00:56:48+5:302019-08-11T00:57:03+5:30

गेल्या आठवड्यात चोथ्याच्या वाडीजवळ संपूर्ण रस्ता तुटून साकूर आणि झाप परिसरातील जवळपास ३५ गावांचा संपर्क तुटला आहे.

landsliding in Javhar | रस्ताच खचल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान

रस्ताच खचल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान

जव्हार : गेल्या आठवड्यात चोथ्याच्या वाडीजवळ संपूर्ण रस्ता तुटून साकूर आणि झाप परिसरातील जवळपास ३५ गावांचा संपर्क तुटला आहे. मात्र आठवडा उलटून गेला तरीही बांधकाम विभागाकडून तुटलेल्या रस्त्याचे काम होत नसल्याने शालेय विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. यासाठी साकूर बस आपटाळे मार्गे सुरू करण्याची मागणी विद्यार्थी करत आहेत.

जव्हार ते साकूर झापकडे जाणारा रस्ता वाहून गेल्याने संपूर्ण रस्ता बंद झाला आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान सुरू आहे. तसेच साकूर येथे मुलींची आश्रमशाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय आहे. मात्र महाविद्यालयात जाण्यासाठी विद्यार्थीनींचे हाल झाले आहेत.
साकूर, आखर, चोथ्याचीवाडी, धानोशी या गावातील विद्यार्थ्यांना जव्हारला जाण्यासाठी सुमारे १२ किलोमीटर पायी प्रवास करावा लागत आहे. गेल्या आठवडाभरापासून रोजच ये-जा करावी लागत असल्याने विद्यार्थ्यांना थकवा आला आहे. याचा विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत आहे. विद्यार्थ्यांची शैक्षणिक अडचण लक्षात घेऊन प्रशासनाने आपटाळेमार्गे साकूर बस सुरू करण्याची मागणी विद्यार्थी करत आहेत.

आम्हला खूपच त्रास सहन करावा लगत आहे. काढलेले एसटीचे पास वाया जाण्याची वेळ आली आहे.
, - ममता पवार, विद्यार्थीनी

आठवडाभरापासून १२ किलोमीटर पायी प्रवास करून महाविद्यालयात जावे लागते. त्यामुळे आमचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
- संतोषी पालवी, विद्यार्थीनी

Web Title: landsliding in Javhar