जव्हारची पाणीबाणी टळली जयसागर डॅम वाहू लागला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 00:24 IST2019-07-15T00:24:38+5:302019-07-15T00:24:46+5:30
मागील तीन दिवसांपासून या शहरासह परिसरात पावसाने विश्रांती घेतली असली तरी पाणीपुरवठा करणारे जयसागर धरण रविवारी वाहू लागल्याने तालुका आणि परिसरावर येऊ घातलेले पाणी टंचाईचे संकट टळले आहे.

जव्हारची पाणीबाणी टळली जयसागर डॅम वाहू लागला
- हुसेन मेमन
जव्हार : मागील तीन दिवसांपासून या शहरासह परिसरात पावसाने विश्रांती घेतली असली तरी पाणीपुरवठा करणारे जयसागर धरण रविवारी वाहू लागल्याने तालुका आणि परिसरावर येऊ घातलेले पाणी टंचाईचे संकट टळले आहे. त्यामुळे शहर वासियांनी आणि गावपाड्यातील आदिवासींनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
गेल्या काही दिवसात झालेल्या जोरदार पावसानंतर पुन्हा पावसाने दमदार ‘बॅटिंग’ केली नाही. शहरासह जिल्ह्यातदेखील पावसाने विश्रांती घेतली आहे. तालुक्यात रविवार पर्यंत ८४७.३० मिमी पावसाची नोंद झाली असून तर रविवारी १४.३८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली असून जिल्ह्यात ८६३.४७ मिमीची नोद करण्यात आली आहे. एका दिवसात ३०० मी.मी. च्या वर पडणारा पाऊस आता दिवसभरात १४ ते १५ मिमी पर्यंत घटला असून थोड्या थोड्या वेळात उन पडत आसल्यामुळे वातावरण अतिशय सुंदर व आल्हाददायक झाले आहे. पावसाने विश्रांती घेतल्याने पर्यटकांचे पाय जव्हारच्या धबधब्यावर वळू लागले आहेत, मात्र पालघर जिल्ह्यात मुख्य पर्यटन ठिकाणी मनाई आदेश लागू असल्यामुले पर्यटकांचा हिरमोड झाला आहे. अशाच रितीने आता खडखड धरणही भरून वाहू लागले की पाण्याची चिंता मिटेल.