अहो, कुणी घर देता का घर?
By Admin | Updated: February 6, 2017 04:18 IST2017-02-06T04:18:09+5:302017-02-06T04:18:09+5:30
नटसम्राट या चित्रपटात घरासाठी कुणी घर देता का घर? असा आर्त टाहो चित्रपटाचा नायक फोडत असतो. तसाच टाहो वाड्यातील आदिवासी बांधव प्रशासन व सरकारला उद्देशून फोडत आहेत

अहो, कुणी घर देता का घर?
वाडा : नटसम्राट या चित्रपटात घरासाठी कुणी घर देता का घर? असा आर्त टाहो चित्रपटाचा नायक फोडत असतो. तसाच टाहो वाड्यातील आदिवासी बांधव प्रशासन व सरकारला उद्देशून फोडत आहेत. तुटपुंज्या उत्पन्नात संसाराचा राहाटगाडा हाकलून शिल्लक काहीच उरत नाही. त्यामुळे आयुष्य कच्च्या, कुडांच्या व मोडकळीस आलेल्या घरात जात आहे. सरकारने विविध आवास योजना आखल्या तरी या आदिवासींना घर काही मिळत नाही. ते मिळणार कधी? असा सवाल करणारे निवेदन आदिवासी मुक्ती मोर्चाच्या वाडा शहर अध्यक्षा निशा वायडा यांनी गटविकास अधिकाऱ्यांना व ग्रामपंचायतीला दिले आहे. आदिवासींना घरकुल मिळावे यासाठी ही संघटना सरकार दरबारी हेलपाटे मारत आहे .
वाडा ग्रामपंचायत हद्दीत पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत २०११ च्या सर्वेक्षणाच्या यादीतील ज्या लाभार्थीची घरे अंत्यत मोडकळीस आलेली आहेत. त्यांना प्राधान्याने घरकुल देण्यात यावे यासाठी ग्रामपंचायत मार्फत एक समिती स्थापन करून तिने पाहणी करून पात्र लाभार्थ्यांना घरकुलांचा त्वरीत लाभ द्यावा अन्यथा आदिवासी मुक्ती मोर्चाच्यावतीने उपोषणाचा मार्ग अवलंबिला जाईल, असा इशारा निवेदनात दिला आहे.
घरकुल वंचितांमध्ये भाऊ पवार, राजेंद्र घरत, सुनिता सिंगासने, सीता शिंदे, बबन कामडी, सुनिल सवरा, यमुना पागी, यमुना कोकाटे, सुवर्णा कोकाटे, मंगेश शिंदे, शंकर दांडेकर, गुुलाब राथड आदी एकूण १५० जणांचा समावेश आहे.